Amravati News: विदर्भातील विशेषतः आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसायासाठी रेशीम शेतीचा पर्याय आहे. या व्यवसायास चालना मिळावी, यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजाराला आता टाळे लागण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय दुर्लक्षासह रेशीमचा दर्जा व भाव, यामुळे हा बाजार अडीच वर्षांतच हेलकावे खाऊ लागला आहे.
विदर्भातील पहिला रेशीम कोष बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बडनेरा येथील उपबाजारात सहा डिसेंबर २०२२ ला सुरू करण्यात आला होता. अमरावती जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रेशीम उत्पादन घेतले जाते. बाजारपेठ नसल्याने कोष निर्मिती झाल्यानंतर विक्रीसाठी चांगलाच त्रास होत होता. शेतकऱ्यांना त्यासाठी हैदराबाद, बंगळूर, कोलकाता येथील बाजारपेठेत जावे लागत होते. स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळाल्यास या उद्योगाला अधिक चालना येईल, या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम प्रादेशिक कार्यालयाने बडनेरा येथील उपबाजारात रेशीम बाजार स्थापन केला.
बडनेरा शहर दळणवळणाच्या दृष्टीने सोईस्कर आहे. राष्ट्रीय महामार्गावर हे शहर असून रेल्वेची सुविधा आहे. बडनेरा येथे प्रमुख रेल्वे स्थानक असल्याने येथील बाजारात मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांनी यावे म्हणून हा बाजार स्थापण्यात आला. सहा डिसेंबर २०२२ ला स्थापन झालेल्या या बाजारात पहिल्याच दिवशी रेशीम कोषाला ६०० ते ६६० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. एकूण ४ लाख ९९ हजार रुपयांची उलाढाल या बाजारात झाली. हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकरी समाधानी होते.
प्रारंभी शेतकऱ्यांकडून या बाजाराला कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र तो वाढला. परराज्यांतूनही व्यापारी खरेदीसाठी येऊ लागले. रेशीम कोषाला योग्य दर मिळावा, अशी उत्पादकांची अपेक्षा होती. परंतु कोषाचा दर्जा कमी असल्याने व्यापारी त्याला दर देईनासे झाले. अखेर रेशीम माल खरेदी-विक्रीच्या दृष्टीने अतिशय सोईस्कर असलेला हा रेशीम बाजार मात्र अडीच वर्षांतच गुंडाळण्याच्या स्थितीत आला आहे.
सध्या रेशीम कोषाचे उत्पादन कमी असल्याने बाजारातील आवक कमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून माल येत नसल्याने व्यापारीही येत नाहीत. एकच खरेदीदार येतो. मात्र त्यालाही खरेदी केलेला माल पश्चिम बंगालला पाठवावा लागतो. प्रक्रिया केंद्र नसल्याने त्याचीही पंचाईत होते.नीलेश विधळे निरीक्षक, उपबाजार बडनेरा
अमरावती विभागासाठी रेशीम पार्क उभारण्यात आले असून येथे निवासी प्रशिक्षणाची सोय आहे. मनुष्यबळ कमी असल्याने एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येते. एआरएम युनिट येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर बाजारात झळाळी येणार आहे. रेशीम पार्कसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.हेमंत लाडगावकर सहायक संचालक, रेशीम पार्क, पाळा
या बाजारात व्यापारी कमी येत असल्याने अपेक्षित भाव मिळत नाही. कोष विकण्यासाठी बीड व जालना येथे जावे लागते. शासकीय अनास्थेमुळे शेतकरी मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळत नाही. अनुदान वेळेवर मिळत नाही, अशा काही समस्या असल्याने रेशीम बाजार फोफावत नसल्याचे चित्र आहे. रेशीम व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे.नरेंद्र नाल्हे, रेशीम उत्पादक शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.