Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांत आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी सुरू असली, तरी बारदान्यासह इतर अडचणी मात्र कायम आहेत. याशिवाय नोंदणी केलेल्या तसेच खरेदीचा एसएमएस पाठविलेल्या व ज्यांच्याकडून प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली. अशा शेतकऱ्यांच्या आकड्यांमध्येही मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळते आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी १५ केंद्रे सुरू करण्यात आली. यामध्ये जालना, अंबड, भोकरदन, मंठा, माहोरा, राजूर, अनवा, बदनापूर, वाटुर परतूर, जाफराबाद, आष्टी, बहिरगाव रामनगर, इंदेवाडी या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवरून सुमारे १५ हजार २०० शेतकऱ्यांकडून २ लाख १५ हजार ८३८ क्विंटल १६ किलो सोयाबीन खरेदी करण्यात आले.
४८९२ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हे सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रांपैकी केवळ पाच केंद्रांवर आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये जाधववाडी, खुलताबाद, पाचोड, शिवना व विहामांडवा या केंद्रांचा समावेश आहे.
या पाच केंद्रांवरून १४२४ शेतकऱ्यांकडून २१ हजार १८१ क्विंटल सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली आहे. आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी लागणारा बारदाना थेट कोलकतावरून येतो. त्याला विलंब होत असल्याने अनेकदा बारदाण्याविना खरेदी ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. आताही छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेल्या बारदाना संपेपर्यंत आवश्यक बारदाना न आल्यास खरेदी बारदानाविना ठप्प पडू शकते. जालन्यातही हीच स्थिती आहे.
अनेकांना नोंदणी करणे शक्य झालेच नाही
आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला दोन-तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. परंतु या मुदतवाढीत पोर्टलच व्यवस्थित चालत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नसण्याची स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे नोंदणी करूनही एसएमएस न मिळालेले व नोंदणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याची स्थिती आहे. त्यामुळे खरेदीसाठीची मुदतवाढ देऊन किती उपयोग होईल हा प्रश्न आहे.
नऊ हजारांवर शेतकऱ्यांना मिळाला नाही ‘एसएमएस’
माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी २४१ शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठवण्यात आले सुमारे ४०५ शेतकऱ्यांना नोंदणी करूनही खरेदीसाठी एसएमएस शक्य झाले नाही.
दुसरीकडे जालना जिल्ह्यातील २८ हजार ५४१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ सुमारे १९ हजार ५४७ शेतकऱ्यांनाच खरेदीसाठीचे एसएमएस यंत्रणेकडून पाठवण्यात आले. तर ८९९४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे यंत्रणेला विहित मुदतीत शक्य झाले नसल्याची स्थिती आहे.
निम्म्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी
खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यांत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी निम्म्याच शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचही केंद्रांवरून नोंदणी केलेल्या २८४६ पैकी २४४१ शेतकऱ्यांनाच सोयाबीन खरेदीसाठीच्या एसएमएस पाठविण्यात आला.
त्यापैकी केवळ १४२४ शेतकऱ्यांकडूनच सोयाबीनची खरेदी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील १५ केंद्रांवरून नोंदणी केलेल्या २८ हजार ५४१ शेतकऱ्यांपैकी १९ हजार ५४७ शेतकऱ्यांनाच खरेदीसाठीचा एसएमएस पाठविण्यात आला. त्यापैकी १५ हजार २०० शेतकऱ्यांकडूनच सोयाबीनचे आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.