Pulses
Pulses Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pulses Market : कडधान्य आयातीत दुपटीहून अधिक वाढ

Team Agrowon

Pulses Market Update : देशात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कडधान्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे देशातील कडधान्य आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत देशात जवळपास १५ लाख टनांची आयात झाली.

त्यासाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले. केंद्र सरकारकडून कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कडधान्यांसाठी देशाचे आयातीवरील अवलंबित्व वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक प्रयत्न करूनही भारताला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता गाठता आली नाही. यंदा ‘एल निनो’चा फटका बसल्यामुळे कडधान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत कडधान्यांच्या पुरवठ्यात मोठा तुटवडा पडला.

त्यामुळे आयातीला पाठबळ मिळाले. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये सुमारे १५ लाख टन कडधान्यांची आयात झाली. मागील हंगामात याच काळात आयात जवळपास ७ लाख टन होती. उरलेल्या काळात होणारी आयात लक्षात घेता यंदा देशात विक्रमी कडधान्य आयात होणार हे स्पष्ट झाले आहे.

आयात वाढल्याने भारताला अतिरिक्त डाॅलर्स खर्च करावे लागले. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत १५ लाख टन कडधान्य आयातीसाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले. तर मागील हंगामात याच काळातील ७ लाख टन आयातीसाठी ५९.५ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले होते. रुपयात सांगायचे झाले तर यंदाच्या सहामाहीत १० हजार ४४० कोटी रुपये खर्च झाले. मागील हंगामात याच काळातील कडधान्य आयातीवरील खर्च ४ हजार ६९५ कोटी रुपये एवढा होता.

मसूर आयातीत तिप्पट वाढ

यंदा भारताने मसूर, तूर आणि उडीद आयात वाढविल्याने एकूण कडधान्य आयात वाढलेली दिसते. विशेषतः मसूरची आयात जवळपास तिप्पट वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत मसूरची आयात ८ लाख टन झाली. तर मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत आयात २ लाख ८१ हजार टन होती. महत्त्वाचे म्हणजे मागील संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये ८ लाख ५८ हजार टन मसुराची आयात झाली होती. म्हणजेच मागील वर्षभरात जेवढी मसूर आयात झाली जवळपास तेवढी आयात आपण यंदा पहिल्या सहामाहीत केली.

अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवरील शुल्क काढल्यामुळे मसूर आयातीने उसळी घेतली. यंदा मसूर आयात १० लाख टनांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. तसेच मसुराची आयात वाढ असल्याने आणि चांगला भाव असल्याने देशातही रब्बी हंगामात मसुराला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. रब्बीत मसूर वगळता हरभरा आणि इतर कडधान्य पिकांच्या लागवडीची गती गल्या वर्षीपेक्षा कमी दिसते.

तूर आयातही वाढण्याची शक्यता

भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत तुरीची २ लाख ७४ हजार टन आयात केली. मात्र मागील वर्षात याच कालावधीत आयात जवळपास दीड लाख टन होती. म्हणजेच यंदा मसूर आयीत सुमारे ८२ टक्के जास्त आहे. तर उडदाची आयात ३९ टक्क्यांनी वाढून २ लाख ४० हजार टनांवर पोचली.

यंदा तुरीची आयात जास्त होऊ शकते. पण आयातीची गती धीमी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आफ्रिकेतील निर्यातदार भारतातील तूर टंचाईचा आणि वाढलेल्या भावाचा फायदा घेत आहेत. मागील वर्षीच्या संपूर्ण हंगामाचा विचार केला तर भारताने जवळपास ९ लाख टन तूर आणि ५ लाख २४ हजार टन उडदाची आयात केली होती. यंदा आयातीचे प्रमाण यापेक्षा अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Fund : पीएम किसानचा हप्ता २ हजाराने वाढणार ? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता

Forest Encroachment : वन क्षेत्रातील पिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई

Kharif Sowing : जूनमधील असमतोल पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये अडथळे

Agrowon Podcast : हळदीत काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूर दर ?

Kolhapur Rain : कोल्हापुरातील २४ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणी पातळी ५ फुटांनी वाढली

SCROLL FOR NEXT