Pomegranate Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Market : आवक मंदावल्याने डाळिंबाच्या दरात वाढ

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : अति पावसामुळे अंबिया बहारातील डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची आवक मंदावली असल्याने डाळिंबाच्या दरात प्रति किलोस २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.

सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो १५० ते १६० रुपये असा दर मिळत आहे. डाळिंबाच्या दरात वाढ झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला असला, तरी डाळिंबावर रोगाचे संकट आल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

राज्यात २५ हजार हेक्टरवर डाळिंबाचा आंबिया बहर शेतकऱ्यांनी धरला. मात्र ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आणि वाढत्या उष्णतेमुळे ३० टक्के फळगळ झाली होती. त्यातूनही शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता करून शेतकऱ्यांनी बागा साधल्या.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली. या दरम्यान, बाजारपेठेत डाळिंबाची आवक हळूहळू वाढल्याने डाळिंबाचे दर चांगले मिळाले. गत वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या प्रारंभी प्रति किलोस २० रुपयांनी दर अधिक होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.

दरम्यान, जुलै महिन्यात डाळिंब उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. तसेच डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विक्रीला आलेल्या डाळिंबाचे नुकसान होऊ लागले आहे.

सध्या राज्यातील ५० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री पूर्ण झाली असून, डाळिंब विक्रीचा हंगाम मध्यावर आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारपेठेत डाळिंबाची आवक मंदावली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये असा दर मिळत आहे.

जुलै महिन्यात डाळिंबाला प्रति किलो १२५ ते १३० रुपये असा दर होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून डाळिंबाच्या दरात हळूहळू वाढ झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात डाळिंबाच्या दरात प्रति किलोस २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दोन नंबरच्या प्रतिच्या डाळिंबाला ९० ते १०० रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

वास्तविक पाहता, हंगामाच्या सुरुवातीपासून दर चांगले मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र अति पावसामुळे डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता

हंगामाच्या प्रारंभीच पाणीटंचाई आणि अति उष्णता यामुळे फळगळ झाली. त्यातच आता पावसामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव या साऱ्याचा परिणाम डाळिंबावर झाला आहे. त्यामुळे आंबिया बहरातील डाळिंबाच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

यंदाचा आंबिया बहर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत साधला. दरही चांगले आहेत. मात्र पावसामुळे डाळिंबावर तेलकटचा प्रादुर्भाव झाला आहे. या साऱ्यामुळे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT