Onion Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export Ban : कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट

मुकूंद पिंगळे

Nashik News : कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळताना केंद्र सरकारची कुठलीही यंत्रणा शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च मिळण्यासाठी पुढे येत नाही. मात्र आवक कमी झाल्यानंतर थोडेफार दर मिळताच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठते.

गारपीट व अवेळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही वसूल होणार नव्हता. त्यातच निर्यातबंदीचा निर्णय घेऊन सरकारने आमच्या पोटावर पाय दिल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याचा सूर तीव्र होत आहे.

उन्हाळ कांद्याला एप्रिल ते ऑगस्टपर्यंत उत्पादन खर्चाखाली दर मिळाले. पुढे आवक कमी होऊन दरात सुधारणा होताच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावले. त्यांनतर पुन्हा कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर प्रतिटन करून ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली.

तर आता निर्यातबंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याला मारायचे धोरणच सरकार राबवीत असल्याची टीका शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकसह राज्यातील १५ बाजार समित्या बंद राहिल्या.

नाशिकमध्ये ठिकठिकाणी रस्ता रोको

निर्यातबंदीनंतर नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, उमराणे, लासलगाव, मनमाड येथील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत निषेध केला. येवला, चांदवड, सटाणा, देवळा, उमराणे, नामपूर, झोडगे, सिन्नर, वणी येथे शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ केला. चांदवड येथे शुक्रवारी (ता. ८) शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केल्याने संतापात भर पडली आहे.

सोशल मीडियावर केंद्राच्या विरोधात युवा शेतकरी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. सटाणा बाजार समितीच्या कार्यालयास टाळे ठोकत सचिव भास्कर तांबे आणि सर्व कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता.९) नाशिक - छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रास्ता रोको केले. निर्यातबंदी मागे घ्यावी, अन्यथा नाशिक जिल्ह्यातील एक किलोही कांदा बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी दिला.

निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यात पाऊस व गारपिटीने शेती उद्ध्वस्त झाली. कांद्याचेही मोठे नुकसान झाले. अशा अस्मानी संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी शेतकऱ्यांवर घाव घालण्याचे काम केंद्राने केले.
- निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव साळ, ता. चांदवड, जि. नाशिक.
केंद्र सरकारने सातत्याने कांदानिर्यातीबाबत अनेक चुकीची धोरणे घेतली. आता बंदीचे शस्त्र उपसून शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट घातला आहे.
- सचिन होळकर, शेती प्रश्नांचे अभ्यासक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
मोदी सरकार एक वेळ कॉंग्रेसला घाबरत नाही, पण कांदा भाव वाढीस नक्कीच घाबरते हेच यावरून सिद्ध होते.
- किरण मोरे, मोरेनगर, ता. सटाणा, जि. नाशिक
शेतकऱ्यांनी अक्षरश टॅंकरने कांदा पिकाला पाणी दिले व तो कांदा तयार झाला. त्यातच गारपिटीने नुकसान झाले. थोडा फार कांदा शिल्लक असताना सरकारने निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवर घाव घातला. तत्काळ निर्यातबंदी मागे घ्यावी.
- नंदकुमार उशीर, धोडांबे, ता. चांदवड, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT