Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयापेंडची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव

Team Agrowon

Pune News : मागील ५ वर्षांपासून पामतेलाचे उत्पादन घटत आहे. तर जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढत असून सोयातेलासाठी गाळपही वाढत आहे. त्यामुळे सोयापेंडची अतिरिक्त निर्मिती होत आहे. परिणामी भाव कमी झाले. तसेच त्याचा परिणाम भारताच्या नॉन जीएम सोयापेंडेच्या भावावरही होत आहे, असे ऑइल वर्ल्डचे कार्यकारी संचालक थॉमस मिल्के यांनी सांगितले.

मुंबई येथे सुरू असलेल्या ग्लोब ऑईल कॉन्फरन्समध्ये जागतिक खाद्यतेल मागणी-पुरवठा आणि किंमत अंदाज या विषयावर थॉमस मिल्के यांनी मार्गदर्शन केले. मिल्के म्हणाले की पाम तेल आता स्वस्त राहिले नाही. पाम तेलाच्या किमती सोयातेलापेक्षा जास्त आहेत. पाम तेलाचे उत्पादन कमी होत असल्याने २०२५-२६ च्या वर्षातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. कारण पाम तेलाचे उत्पादन वाढवायचे म्हटल्यास किमान ४ ते ५ वर्षे लागतील.

कारण पामची आता लागवड केली तर २०२८ नंतर उत्पादन मिळेल. यामुळे सध्या पाम तेल महाग होत आहे. मिल्के म्हणाले की सध्या पाम काढणीचा हंगाम सुरू आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये काढणी सुरू होते. त्यामुळे या तीन महिन्यांत पामतेलाचा पुरवठा बऱ्यापैकी वाढलेला असेल. परिणामी, काही काळ सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा पाम तेल स्वस्त राहिले तरी कायमस्वरूपी ही स्थिती राहू शकणार नाही. कारण सोयातेल आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढलेला आहे.

यंदाही सोयापेंड पुरवठा जास्त राहणार

सोयाबीनचे उत्पादन वाढले. मागणी असल्याने गाळपही वाढले. २०२४ मध्ये जागतिक सोयाबीन गाळप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सोयातेल आणि सोयापेंडची निर्मिती वाढली आहे. २०२४-२५ च्या हंगामातही सोयातेलासाठी सोयाबीनचे गाळप १६० ते १७० लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे. मात्र या गाळपामुळे सोयापेंडचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. सोयाबीनचा भाव सोयातेलापेक्षा सोयापेंडच्या भावावर जास्त प्रमाणात अवलंबून असतो. पण अतिरिक्त पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव कायम राहू शकतो.

भारत उत्पादकतेत मागे

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन आणि गाळप वाढत आहे. त्यामुळे सोयातेल आणि सोयापेंड निर्मितीही वाढली. पुरवठा वाढून भावावर दबाव येत आहे. पण भारतात उत्पादकता कमी असल्याने स्पर्धेत टिकत नाही. जागतिक पातळीवर हेक्टरी ३ टन उत्पादकता असताना भारतात केवळ १ टन उत्पादकता आहे. उत्पादकता कमी असल्याने भारताला सोयाबीन आर्थिकदृष्ट्या परतावा देऊ शकत नाही. त्यासाठी भारताने हेक्टरी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असेही मिल्के यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT