Wheat Stubble
Wheat Stubble Agrowon
ॲग्रोमनी

चाऱ्याचे दर वाढूनही पंजाबमध्ये शेतकरी गव्हाचे कुटार का जाळत आहेत?

Team Agrowon

पंजाबमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गव्हाच्या कापणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून (कुटार, काड) 'तुडी' हा कोरडा चारा तयार केला जातो. त्यातील पोषक घटकांमुळे या तुडीला चांगली मागणी असते. परंतु तरीही पंजाबमध्ये गव्हाच्या कापणीनंतर उरलेले अवशेष जाळून टाकले जातात. त्यासाठी पंजाबमध्ये १ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान ३८९५ शेतांमध्ये आगी लावल्याची सरकारी आकडेवारी उपलब्ध आहे. गव्हाच्या अवशेषांपासून तयार करण्यात येणाऱ्या चाऱ्याला चांगला दर असूनही शेतकरी हे अवशेष का जाळत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो.

इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. गहू कापणीपूर्वी पंजाबमध्ये या तुडीला राज्यात प्रति क्विंटल ९५० ते ११०० रुपये दर होता. राज्यात सध्या तुडी ४०० ते ८०० रुपये दराने विकला जात आहे. राजस्थानात तुडीला ९५० रुपये क्विंटल दर मिळतो आहे.

२०२१-२०२२ च्या रब्बी पेरणी हंगामात गहू लागवडीखालील क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुडी साठवायला सुरुवात केली. त्यामुळे तुडीचे दर वाढले.

मार्च महिन्यातील उष्णतेचा फटका बसल्याने गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे तुडीच्या उत्पादनातही १५ ते २० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तुडीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तरीदेखील शेतकऱ्यांकडून अवशेष जाळले जात आहेत.

तुडी उत्पादनाचा संबंध गहू उत्पादनाच्या प्रमाणाशी जोडल्या गेलेला आहे. या हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. गहू कापणीनंतरचे अवशेष वजनदार असतील तर एका एकरातून २४ क्विंटल तुडी हाती लागतो. मात्र सध्या केवळ १८ क्विंटल तुडी मिळत असल्याचे रज्जैन (अमृतसर) येथील शेतकरी सतनाम सिंग म्हणाले.

स्वतःकडे गुरेढोरे नसली तरी बहुतांशी शेतकरी तुडीचा साठा करून ठेवतात. यंत्राच्या (मशिन) साहाय्याने गव्हाच्या अवशेषापासून तुडी तयार केली जाते. त्यासाठी शेतकरी एका ट्रॉलीसाठी मशिनमालकाला १२०० रुपये देतो. म्हणजे सध्या शेतकऱ्यांना एकरी २४०० रुपये खर्चावे लागत आहेत.

दरम्यान सध्या राज्यातील शेतकरी अवशेष जाळत नसून तुडी तयार केल्यानंतर त्याच्या वरचा भाग शिल्लक राहतो, तो जाळला जात असल्याचे पठाणकोटचे कृषी अधिकारी डॉ. अमरिक सिंग यांचे म्हणणे आहे.

अवशेषांचा हा वरचा भागही जाळण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अवशेषात मातीला पोषक घटकांचा समावेश असतो. या अवशेषात जमिनीला पोषक घटक असून ते उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकणार असल्याचे सिंग यांनी नमूद केले आहे.

गव्हाच्या हंगामांनंतर शेतकऱ्यांना भातपिकाची लागवड करायची असते, त्यामुळे त्यांना सगळे अवशेष नाहीसे करणे भाग पडते. भातपिकासाठी चिखलणी करण्यापूर्वी शेतकरी पूर्वीचे सगळे अवशेष जाळून टाकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT