Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Market : वाशीत हापूस दरात हजार रुपयांची घट

Mango Rate : कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक ३१ हजार पेट्यांवर पोहोचली आहे. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक ३१ हजार पेट्यांवर पोहोचली आहे. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. दर कमी होण्याला लाल समुद्रामध्ये हुती दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांमुळे युरोपकडील रखडलेल्या निर्यातीचेही कारण पुढे येत आहे.

समुद्रमार्गे होणाऱ्या निर्यातीचा भार हवाई वाहतुकीवर वाढल्यामुळे मागणी असूनही युरोप, अमेरिकेला आंबा निर्यात होत नाही. हा माल बाजारातच राहिल्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे कारण जाणकार तसेच व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हापूसचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाला. कोकणातून दिवसाला पाचशेपेक्षा अधिक पेट्या वाशी बाजारात पाठविण्यात येत होत्या. यंदा हापूसचे वारेमाप पीक येईल, असा अंदाज होता. मात्र थ्रिप्सचा प्रादुर्भाव आणि जानेवारीत पडलेल्या पावसाने हापूसला फटका बसला. मोहर गळून गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

अनियमित थंडीमुळे दुबार मोहराचे संकट बागायतदारांपुढे आहे. आंबा काढणी वेगाने सुरू असतानाच शेवटच्या टप्प्यात आलेला मोहर वाचविण्यासाठी बागायतदार कीटकनाशकांच्या फवारण्या करीत आहेत. पहिल्या टप्प्यात आलेला बहर आता ओसरला असून दुसऱ्या टप्प्यातील फळ काढणीला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला बाजारात पेटीचा दर साडेसहा हजार रुपयांपर्यंत होता. हा दर पहिल्या पंधरवड्यात स्थिर होता. पण त्यानंतर परराज्यातील आंब्याची आवक वाढू लागल्यामुळे हापूसच्या दरावर परिणाम होऊ लागला. मार्चच्या सुरुवातीला उन्हाच्या कडाक्यामुळे तयार झालेला आंबा काढणीसाठी बागायतदार सरसावले. शनिवारी (ता. १६) वाशी बाजारात ३९ हजार पेटया दाखल झाल्या. त्यातील ३१ हजार पेट्या हापूसच्या असून उर्वरित ८ हजार पेट्या अन्य राज्यांतील आहेत.

वाशी बाजारावर हापूसचे दर अवलंबून असतात. गेल्या चार दिवसांपासून हापूसचा पेटीचा दर २ हजार ते साडेचार हजार रुपये आहे. बाजारातील आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. तसेच लाल समुद्रात हुती दहशतवादी संघटनांनी मालवाहू जहाजांवर हल्ले केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्याचा परिणाम समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे.

अनेक कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग टाळत केप ऑप गुड होपचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका भारतामधील निर्यातीला बसला आहे. अनेक कंपन्यांनी युरोपसह अमेरिका, आखाती देशांमध्ये मालवाहतुकीसाठी हवाई मार्गाचा अवलंब केला आहे. त्यामुळे हवाई कंपन्यांवर भार वाढला असून हापूसच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला आहे.

निर्यात होणारा माल स्थानिक बाजारात राहिल्यामुळे दर कमी झाल्याचे मुख्य कारण असल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. वाशीतील हापूसचे दर सुमारे १ ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वाशीतील दर कमी झाले असले तरीही वैयक्तिकरित्या आंबा विकणाऱ्यांना चांगला दर मिळत आहे.

हापूसची आवक वाढली असतानाच निर्यातीमध्येही अडथळे निर्माण झाले आहेत. लाल समुद्रातील हुती दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यामुळे हवाई मार्गे निर्यात वाढली आहे. सर्वाधिक हापूस हवाई मार्गे पाठविला जातो. कार्गो कमी आणि माल अधिक अशी स्थिती असल्याने आंबा पाठविण्यात वेळ लागत आहे. मागणी असूनही आंबा पाठविणे शक्य होत नाही.
- संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT