Beed Water Scarcity Agrowon
ॲग्रो गाईड

Beed Water Scarcity : बीडमधील माजलगावसह तीन धरणात शून्य टक्के पाणीसाठा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्यांना हैराण केले असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. यादरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मात्र सर्वसामान्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये देखील सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८ छोट्या मोठ्या धरणात उपयुक्त पाणीसाठा जेमतेम शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील माजलगावसह तीन धरणांमध्ये पाणीसाठा शून्य टक्के आहे. यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा राज्यातील ४० तालुके आणि १,१०० हून अधिक मंडलांत सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला आहे. तर सध्या राज्यातील १,८३४ गावे आणि ४,४३४ वाड्यांवर २३२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक टँकर मराठवाड्यातील छ. संभाजीनगर यानंतर जालना आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात लागत आहेत.

पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील १६२ गावे १२६ वाड्यावस्त्यांवर १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर संभाव्य टंचाई विचारात घेत पशुसंवर्धन विभागाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. यामुळे अद्याप येथे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तर जिल्ह्यातील चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून याआधीच प्रशासनाने चारा बंदी केली आहे. तसेच महावितरणशी बोलून अवैध्य कृषी पंपांवर कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे पीक चांगले झाले असून कडबा भरपूर आहे. यामुळे जिल्ह्यात कोठेच चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही असेही प्रशासनाने म्हटले आहे.

राज्यात मागच्या वर्षी पाऊस झाला नसल्याने यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आधीच पावले उचलली. जिल्ह्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून धरणांसह तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. विहरींचे देखील आधिगृहन करण्यात आले आहे. तसेच चाऱ्याच्या बाबतीत दक्षता घेतना ज्वारीसह चारा पिकाच्या लागवडीवर भर देण्यात आला होता. यामुळे सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कडबा तयार झाला आहे. यामुळे चाऱ्याचा सध्यातरी प्रश्न निर्माण झालेला नाही. तर अवैध पाणी उपसा होऊ नये म्हणून अवैधी कृषी पंपावर कारवाई केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
-दीपा मुधोळ-मुंडे , जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी

मात्र जिल्ह्यात पाणीटंचाई आणि वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये म्हणावे तसे चाऱ्याचे उत्पादन झालेले नाही. यामुळे चाराटंचाईची भीषण समस्या भासू लागली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पशुधनाचा विचार करताना जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासनाने वैरनीचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने बियाणे पुरवले होते. परंतु रब्बी हंगामात पेरण्याच अत्यल्प झाल्या. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही. यामुळे जिल्ह्यातील अधिकतर शेतकऱ्यांकडे चारा शिल्लक नाही. पाण्याचीही तीव्र टंचाई आहे. यामुळे चारा छावण्या सुरू होणे गरजेच्या आहेत.
- सचिन थोरात , शेतकरी पांगरी ता.धारूर जि.बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT