Organic Carbon
Organic Carbon Agrowon
ॲग्रो गाईड

Organic Carbon : सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाययोजना

डाॅ. आदिनाथ ताकटे

जमिनीची सुपीकता (Soil Fertility) ही जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय कर्बाच्या (Organic Carbon) प्रमाणात अवलंबून असते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे त्या प्रदेशातील हवामान, मातीचा प्रकार (Types Of Soil), पीक पद्धती, जमिनीची मशागत इत्यादी घटकावर अवलंबून असते. भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची जमिनीतील मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.२ टक्क्यांपासून ती जास्तीत जास्त ०.५० टक्क्यांपर्यंत आहे.

सेंद्रिय कर्बाचा प्रत्यक्ष परिणाम एकूण नत्र, उपलब्ध नत्र आणि उपलब्ध स्फुरदाच्या आणि अप्रत्यक्षरीत्या उपलब्ध पालाशच्या प्रमाणावर झाला आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन, जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात प्रतिकूल बदल होणे असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

राज्यातील शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी प्रमाणात होत आहे. म्हणून सद्य परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे (०.२ ते ०.५ टक्के) त्यामुळे जमिनीचा कस कमी होणे, जमिनीची धूप अधिक होणे, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल प्रभाव पडतो. जमिनीतील घनता (घट्टपणा) कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. त्यामुळे हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. मातीची धूप कमी होते आणि मातीची जडणघडण सुधारते.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धतता वाढल्याने जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जिवाणूंच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सेंद्रिय कर्बामुळे सामू तटस्थ (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते. आयन विनिमय क्षमता वाढते. नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरादाची उपलब्धता वाढते.

जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता वाढते. चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. सेंद्रिय कर्बामुळे विकारांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. ही विकरे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवितात. नत्र, स्फुरद व पालाश यांची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे जिवाणू कारणीभूत असतात.

हवामान बदलाचे जमिनीतील सेंद्रिय कर्बावर होणारा परिणाम

हवामान बदलामुळे होणारी तापमान वाढ आणि ओझोन थरात झालेल्या घटीमुळे भूपृष्टावर पडणारी अतिनील किरणे यामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा विघटनाचा वेग वाढतो, परिणामी जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन सुपीकता कमी होते. शेतामधील ऊस पाचट, काडीकचरा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होत आहे.

हवामानाच्या जास्त आणि कमी अशा पावसाच्या दोनही बाबींचा जमिनीच्या सुपिकतेवर निरनिराळा प्रभाव असतो. कमी पाऊस आणि अवर्षण यामुळे सेंद्रिय ऱ्हास होतो. जास्त कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीतही सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटवून पाण्यासोबत वाहून जातो.

सक्रिय कर्ब हा पिकांच्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी व सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीसाठी, ह्युमिक कर्ब जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी तसेच निष्क्रीय कर्ब जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असतात. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय पदार्थाद्वारे ऊर्जा पुरविली जाते, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता चांगली होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवली जाते.

बदलत्या हवामान परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचे संवर्धन

कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप बांधबंदिस्ती द्वारे कमी करावी.

पिकांच्या अवशेषाचे आच्छादन म्हणून वापर. उदा.खोडवा उसात पाचटाचे नियोजन, अवर्षण प्रवण भागात ज्वारी पिकात तुरकाठ्या, बाजरी सरमाडाचे आच्छादन.

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारसी प्रमाणे सेंद्रिय, कंपोस्टचा वापर करावा.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी कमी तीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाचा वापर करावा. यांचा वापर बीजप्रक्रिया तसेच शेणखतात मिसळून वापर करावा.

पिकांच्या फेरपलटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा. खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी, योग्य प्रकारे द्यावी.

- डॉ. आदिनाथ ताकटे,

९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT