Bee Keeping
Bee Keeping Agrowon
ॲग्रो गाईड

Bee Keeping : मधमाश्या वसाहतीतील प्रमुख घटक

टीम ॲग्रोवन

डॉ. अमोल काकडे,डॉ. प्रशांत भोसले

शेतीपूरक व्यवसायांमध्ये मधमाशीपालन (Bee Keeping) या उद्योगाचा समावेश होतो. विविध उपयुक्त कीटकांमध्ये एक मधमाश्या (Bee) आहेत. मधमाश्यांचा उपयुक्त कीटकामध्ये समावेश होतो. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन (Albert Einstein) यांच्या म्हणण्यानुसार, जर पृथ्वीतलावरून मधमाशी नाहीशी झाली, तर मानव प्रजातीचे फार काळ अस्तित्व राहणार नाही. यावरून मधमाश्यांचे महत्त्व लक्षात येते.

अलीकडच्या काळात पिकांवर विविध कीटकनाशकांचा बेसुमार, अमर्यादित व अवेळी वापरामुळे मधमाश्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. वनस्पतीमधील परागीभवन क्रियेमध्ये मधमाश्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या रासायनिक घटकांच्या वापरामुळे मधमाश्या पृथ्वीवरून नष्ट झाल्यास अनेक वनस्पती, पिके परागीभवनाअभावी नष्ट होऊन पर्यावरणाचा असमतोल निर्माण होईल.

मधमाशीपालनाचे उद्देश

कृषी, भाजीपाला पिके, फळवर्गीय व तेलवर्गीय पिकांचे परागसिंचन करून त्यांचे उत्पादन वाढविणे.

मधमाश्यांद्वारे मध व मेण ही उत्पादने तयार केली जातात. मध हे अत्यंत शक्तिवर्धक, पौष्टिक अन्न व औषध गुणधर्मयुक्त आहे. यासह काही तत्सम पदार्थांचे उत्पादनही मिळते.

मधमाश्यांपासून रॉयल जेली, बी व्हेनम, पोलन (पराग) इ. औषधी गुणधर्म असलेल्या उच्च प्रतीच्या पदार्थांचे उत्पादन मिळते.

मेणाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनांमध्ये होतो.

रॉयल जेलीमध्ये विविध प्रथिने, जीवनसत्त्वे असतात.

संधिवात या आजारावर उपचार करण्यासाठी बी व्हेनमचा वापर केला जातो.

वसाहतीची रचना

मधमाशीचे पोळे हे मेणापासून बनविलेले असते. मधमाश्या पिलांना वाढविण्यासाठी, मध व पराग साठविण्यासाठी मेणाची षटकोनी घरे बांधतात.

मधमाश्यांच्या पोटाखाली मेणग्रंथीच्या चार जोड्या असतात. त्यातून स्रवणाऱ्या मेणाचा उपयोग पोळे बांधण्यासाठी केला जातो. पुढील दोन पायांच्या जोड्या व तोंडाच्या काही भागाच्या मदतीने मधमाश्या वसाहतीमध्ये षटकोनी घरे असलेल्या पोकळ्या बांधतात.

मधपोळ्यामध्ये विविध प्रकारचे अणू कोष असतात.

मध साठवण अणुकोषाच्या खालील बाजूस अपरिपक्व अवस्थेतील अणुकोष असतो. यामध्ये कामकरी माश्‍या, नर आणि राणीमाशीचे कोष अशा तीन प्रकारच्या कोषांची गुंफण असते.

मधमाशी वसाहत आणि प्रमुख घटक

मधमाश्या या समूहाने राहतात. एका समूहामध्ये सुमारे १० ते ३० हजार माश्‍या असतात. त्यात १ राणी माशी, कामकरी, नरमाश्या व त्यांचा पिलावा असतो. या सर्व समूहाला ‘वसाहत’ असे म्हणतात. राणी माशी, कामकरी व नरमाश्या हे वसाहतीतील प्रमुख घटक आहेत.

मधमाश्यांचा अवस्थेनुसार जीवनक्रम

अवस्था राणी कामकरी नर

अंडी अवस्था ३ ३ ३

अळी अवस्था ५ ५ ६

कोषावस्था ७ १३ १५

एकूण दिवस

(अंडी ते माशी) १५ २१ २४

राणी माशी

एका वसाहतीत एकच राणी माशी असते. इतर माश्‍यांच्या तुलनेत ती आकाराने सर्वांत मोठी असते.

राणी माशीने अंडी घातल्यानंतर १६ व्या दिवशी राणींचा जन्म होतो. जन्मल्यानंतर ५ ते १० दिवसांच्या दरम्यान राणींचा नराबरोबर पेटीच्या बाहेर हवेत संयोग होतो.

वातावरण स्वच्छ असताना सकाळी ११ ते ४ या काळात राणीमाशी संयोगासाठी हवेत उड्डाण करते. नराचे शुक्रबीज राणीच्या पोटात असलेल्या एका विशिष्ट पिशवीत साठवले जाते. या पिशवीचा वापर मधमाशीच्या संपूर्ण जीवनकाळात अंडी घालण्यासाठी होतो. कारण एकदा नराशी संयोग झाल्यानंतर पुन्हा संयोग होत नाही.

नरासोबत यशस्वी संयोग झाल्याच्या २४ तासांनंतर राणीमाशी अंडी घालण्यास सुरुवात करते. राणीमाशी सफल व अफल अशा दोन प्रकारची अंडी घालते. सफल फलित अंड्यातून राणीमाशी व कामकरी माश्‍या, तर अफल अंड्यापासून नराचा जन्म होतो.

मधाच्या हंगामात राणीमाशी प्रतिदिन ५०० ते १००० अंडी घालते. एका राणीमाशीचे आयुष्य साधारणपणे २ ते ३ वर्षांचे असते.

कामकरी माशी

कामकरी माश्‍यांच्या घरात राणीने ‘सफल’ अंडी घातल्यानंतर २१ दिवसांनी कामकरी माश्‍यांचा जन्म होतो.

या माश्‍या आकाराने सर्वांत लहान असतात.

या नपुंसक स्टारायील मादी माश्‍या आहेत. यांच्या जननेंद्रियांची वाढ पूर्ण न झाल्याने नराबरोबर संयोग होऊ शकत नाही.

माश्‍यांच्या डोक्यात फॅरिजियल ग्रंथी असतात. पोटाखालच्या बाजूस मेणग्रंथींच्या चार जोड्या असतात. त्यातून त्या मेण स्रवतात.

या माश्‍यांचे आयुष्य विजेरीच्या घटकाप्रमाणे असते. तिला जेवढे जास्त काम करावे लागेल तेवढी ती लवकर मरते.

वसाहतीपासून साधारण १ ते १.५ किमीपर्यंत पराग, मकरंद, पाणी आणण्याकरिता या माश्‍या जातात.

या माश्‍यांचे आयुष्य मध हंगामात दीड ते ३ महिने व कमी काम असल्यास ६ महिन्यांपर्यंत असते.

वसाहतीत कामकरी माश्‍या जन्मास आल्यापासून त्यांच्या वयोमानानुसार कामे करतात. पोळे बांधणे, नवीन राणी माशी तयार करणे व तिची काळजी घेणे, पोळ्यांचे संरक्षण इत्यादी कामे करतात.

नरमाश्‍या

नरमाश्‍यांच्या घरात राणीमाशीने ‘अफल’ अंडी घातल्यानंतर २४ दिवसांनी पूर्ण वाढलेली नरमाशी कोषातून बाहेर पडते.

आकाराने राणी माशीपेक्षा लहान व कामकरी माशीपेक्षा जास्त मोठी असते.

नरमाशीला नांगी नसल्याने ती दंश करू शकत नाही.

साधारण १० ते १४ दिवस किंवा त्याहून जास्त वयाचे नर राणीबरोबर संयोग करतात. संयोग हवेत होतो. जननेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे संयोगानंतर नराला राणीमाशीच्या जननेंद्रियातून आपले जननेंद्रिय काढून घेता येत नाही. त्यामुळे जननेंद्रिय तुटून नर जखमी होऊन मरण पावतो.

नरमाश्‍या कोणतेही काम करीत नाहीत. राणीशी संयोग झाल्यानंतर कामकरी माश्‍या वसाहतीतील नरांना ठार मारून टाकतात.

- डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५

(विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

SCROLL FOR NEXT