Turmeric  Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric Management : हळदीमध्ये भरणी केल्याचे काय फायदे होतात?

Team Agrowon

डॉ. मनोज माळी, डॉ. जितेंद्र कदम

Turmeric Filling Management : हळद लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंडे झाकले जाऊन त्यांची वाढ चांगली होते.

हळद हे प्रमुख नगदी मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनामध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. विविध गुण वैशिष्ट्यांमुळे हळदीला ‘सुपर फूड’ म्हटले जाते. महाराष्ट्रातील हवामानात हळद पिकाचे उत्पादन उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

हळद पिकात उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा जमिनीत वाढणारे कंद असतो. त्यामुळे जमिनीतील मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी या चार प्रमुख घटकांचे संतुलन राखले जाईल याची काळजी घ्यावी. मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असलेल्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले, तर जमीन कोरडी होऊन मुळांच्या वाढीस वाव मिळत नाही. जमिनीत पाणी जास्त झाले तर कंद कुजण्याचे प्रमाण वाढते.

सध्या हळद लागवड होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या वेळी वातावरणात २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या काळात पिकाची शाकीय वाढ होत असते. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, या काळात हळद लागवडीत आंतरमशागतीची कामे तत्काळ करून घ्यावीत. यात प्रामुख्याने भरणी, खते व पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो.

आंतरमशागत (भरणी करणे)

लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. कारण या कालावधीमध्ये पिकास फुटवे येण्यास व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेतील माती शिपीच्या कुदळीने १.५ ते २ इंच खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजेच ‘भरणी करणे’ होय. संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी.

भरणी केल्यानंतर पाऊस नसेल, तर पिकास हलके पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती पावसाने वाहून जाणार नाही.

भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंडे झाकले जाऊन त्यांची वाढ चांगली होते.

भरणी न केल्यामुळे हळकुंड सूर्यप्रकाशात येऊन ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते.

गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्याच्या मधल्या जागेतील माती मोकळी करून करून गादीवाफ्यांवर भर द्यावी.

मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करतांना ड्रीपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

खत व्यवस्थापन

हळद पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. लागवडीवेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश, तर नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.

नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी, तर भरणी वेळी (लागवडीपासून २.५ ते ३.० महिन्यांनी) दुसरा हप्ता द्यावा. या वेळी युरिया २१५ किलो, तसेच फेरस सल्फेट १२.५० किलो आणि झिंक सल्फेट १० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे. शिवाय निंबोळी किंवा करंजी पेंड हेक्टरी २ टन प्रमाणे वापर करावा.

पाणी व्यवस्थापन

पावसाचे पाणी हळद लागवडीमध्ये साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी साचून राहिल्यास मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज पडून मलूल होतात. साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे.

रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचन करावे. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.

तणनियंत्रण

लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या प्रमाणानुसार निंदणीची कामे करावीत. उगवणीनंतर तणनाशक फवारणी टाळावी.

भरणीचे फायदे

पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे संपूर्णपणे झाकले जातात. त्यामुळे कंदमाशीला गड्ड्यांवर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदत होते, शिवाय कंदकुज रोगाला आळा बसतो.

उघड्या गड्ड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात व त्यांची चांगली वाढ होते.

उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. त्यामुळे पिकांस व्यवस्थित व समप्रमाणात पाणी मिळते.

भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळून मातीखाली झाकली जातात. त्यामुळे खतांचा होणाऱ्या ऱ्हास आणि अपव्यय टाळला जातो. खतमात्रा पिकाच्या मुळांजवळ पडल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते.

मातीखाली झाकलेल्या हळदीच्या जेठा गड्ड्यांची वाढ चांगली होते. हळकुंडांची संख्या वाढण्यास मदत होते.

पिकास कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्यक अन्नघटक शोषण क्रिया सुधारते.

पिकात उगवलेल्या तणांचा नाश होण्यास मदत होते. निंदणीच्या खर्चात बचत होते.

जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंड चांगली पोसली जातात.

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT