Heat Wave  Agrowon
ॲग्रो गाईड

Heatstroke Update : ‘उष्माघात’ कसा टाळायचा?

Team Agrowon

डॉ. अनंत फडके

Summer Season : उष्माघात होतो म्हणजे काय होते? उष्माघात का होतो, याची माहिती करून घेण्याची गरज आहे. उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे. त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत, तर मृत्यू येऊ शकतो.

उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइटच्या पुढे जाते. हवा खूपच दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही. त्वचा लाल होते, हाताला खूप गरम, कोरडी लागते.

अजिबात घाम येत नाही. ती व्यक्ती ग्लानीत जाते, कधी कधी बेशुद्ध होते, झटकेही येतात. नाडी फार जलद होऊन रक्तदाब खालावतो. रक्त-तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात. वेळेवर, योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येतो.

आपल्या शरीराचे तापमान वर्षातील सर्व ऋतूंत ३७ अंशाच्या खाली राहावे, अशी निसर्गाची योजना असते. त्यासाठी शरीरात एक ‘तापमान-संतुलन-व्यवस्था’ असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान वाढत नाही.

या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो. या तापमान-संतुलन-व्यवस्थेवर तीव्र उन्हाळ्यात फार ताण पडला, तर ती बिघडून उष्माघात होऊ शकतो.

विशेषत: उन्हात किंवा गरम वातावरणात श्रमाचे, अंगमेहनतीचे काम करावे लागले व त्याच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी काही उपाय केले नाहीत तर आपली तापमान-संतुलन-व्यवस्था कोलमडून ‘उष्माघाताचा झटका’ येऊ शकतो.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

तीव्र उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा ५ अंशांनी वाढल्यास किंवा ४५ अंशांपेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी.

त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात, लिंबू-सरबतात किंवा ताकात मीठ घालून प्यायला हवे. (लघवी गडद पिवळी झाली तर समजायचे, की आणखी पाणी प्यायला हवे) तीव्र उन्हाळ्यामध्ये भर उन्हात सतत तसेच खूप श्रमाचे काम करणे टाळावे. मधूनमधून सावलीत थांबावे.

शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. उन्हात काम करावे लागलेच, तर पूर्ण झाकणारे पांढरे किंवा फिकट रंगाचे शरीर सुती कपडे घातल्याने सूर्य-किरण शरीरात शोषले न जाता परावर्तित होतात. कपडे गळाबंद असू नयेत, हवा खेळती राहील असे सैलसर असावे. घरातून बाहेर पडताना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे.

पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लट्ठ व्यक्ती, दारूच्या अमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

तसेच रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षाचालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यावी. दमट हवेत काम करणाऱ्यांना त्या हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम न आल्याने अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.

सार्वजनिक ठिकाणी (शैक्षणिक संस्था, दुकाने, सरकारी व खासगी कचेऱ्या, दवाखाने, रुग्णालये, प्रवासी थांबे, रेल्वे स्टेशन) येणाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी पुरेसे व मोफत उपलब्ध करून देणे हे त्या त्या संस्थांचे कर्तव्य आहे.

उष्माघात कसा ओळखावा?

उष्माघात अगदी अचानक, अनपेक्षित येत नाही. नीट लक्ष दिल्यास त्याची आधी चाहूल लागते. उन्हाळ्यात तहान, थकवा घालविण्यासाठी मीठ-पाणी, सावलीत, गार हवेत विश्रांती अशा गोष्टी पाळल्या नाहीत, शरीरातील तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्व-सूचनेकडे दुर्लक्ष केले, तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायांचे व पोटाचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे (heat cramps) असा त्रास होतो.

हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत, शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, मीठ घालून भरपूर पाणी घेणे हे कटाक्षाने करायला हवे. अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्म-दमछाक असा त्रास होतो.

यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर मळमळ, उलटी असा त्रास होतो. कधी कधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते. कधी कधी भ्रमिष्टासारखी अवस्था होते. अशा माणसाला वेळीच सावलीत, शक्यतो गार जागेत हलवून विश्रांती द्यायला हवी.

भरपूर पाणी व पुरेसे मीठ पोटात जाईल असे पाहावे. असे नाही केले तर शेवटी उष्माघाताचा झटका येतो. वर दिल्याप्रमाणे अशा व्यक्तीमध्ये १०४ अंशांपेक्षा जास्त ताप, ग्लानी/बेशुद्धी किंवा झटके, कोरडी त्वचा, जलद नाडी, घसरलेला रक्तदाब अशी लक्षणे, चिन्हे दिसतात.

उष्माघातावरील उपचार

उष्माघाताची लक्षणे, चिन्हे दिसली तर त्वरित उपचार करावेत. प्रथमोपचार म्हणून रुग्णाला सावलीत, गार जागेत हलवणे, कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा. गार पाण्याने अंग पुसत राहावे, बर्फ, बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा.

दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये ३८ अंशांच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फ, बर्फाचे पाणी असल्यास वापरतात. फ्रीजमध्ये ठेवलेले सलाइन नीलेवाटे देणे, बर्फाच्या पाण्याचा एनिमा देणे असे उपायही परिस्थितीनुसार केले जातात.

मात्र गार पाण्याचा फवारा व पंख्याचा झोत यावरच सहसा जोर देतात. मलेरिया इ. दुसरा कोणता आजार नाही ना, उष्माघातामुळे शरीरात आणखी काही बिघाड झालेला नाही ना, हे बघण्यासाठी रक्त इ. तपासतात आणि गरजेनुसार पुढील उपचार करतात.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

- उन्हात, गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधून मधून सावलीत थांबावे.

- शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी.

- तहान शिल्लक ठेवू नये. त्यासाठी दर तासाला एक ग्लास, लघवी गडद पिवळी होणार नाही, एवढे पाणी प्यावे.

- हवेचे तापमान ४४ अंशांपेक्षा असेल तर शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, दुकाने इ. सकाळी ११ ते दुपारी ४ बंद ठेवाव्या.

- दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात मीठ घालून प्यावे.

- शरीर पूर्ण झाकले जाईल; पण हवा खेळती राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे, सुती कपडे घालावे.

- घरातून बाहेर पडताना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे.

- उष्माघाताची शंका आल्यास लगेच सावलीत नेऊन, अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.

(लेखक आरोग्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)

ई-मेल - anant.phadke@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT