ॲग्रो गाईड

Women Empowerment : महिला हक्कासाठी लढणाऱ्या : चंद्रप्रभा

टीम ॲग्रोवन

ईशान्य भारतातील सर्वांत मोठं राज्य म्हणजे आसाम (Assam). इथल्या कामरूप जिल्ह्यात १६ जानेवारी १९०१ साली चंद्रप्रभा सैकियानी (Chandraprabha Saikeyani) चा जन्म झाला. त्यांचे वडील ग्रामप्रमुख होते. ते काळाच्या पुढे बघणारे, विचारी गृहस्थ होते. आपल्या मुलामुलींनी शिकलं पाहिजे, असं त्यांना मनापासून वाटत होतं.

त्यांना एकूण अकरा अपत्यं असली तरीही आपल्या सर्वच मुलांना त्यांनी आग्रहाने शाळेत पाठवलं. या अकरा मुलांपैकी चंद्रप्रभा ही सातवी मुलगी. शिक्षण घ्यायचं ठरलं तरी या मुलांना जवळची शाळा उपलब्ध नव्हती. पाच-सहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शाळेत अत्यंत खडतर रस्त्याने पायी जावं लागायचं.

पण चंद्रप्रभा आणि तिच्या भावंडांनी शिक्षणासाठी हा त्रास विनातक्रार सहन केला. या कष्टांचंच एक गोड फळ म्हणजे चंद्रप्रभा यांची एक बहीण रजनीप्रभा सैकियानी या पुढे आसाम राज्यातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नावारूपाला आल्या. चंद्रप्रभा अभ्यासात अतिशय हुशार होती. शिक्षण घेत असतानाच तिचं लक्ष समाजात आजूबाजूला दिसणाऱ्या गोरगरिबांच्या अशिक्षित मुलांकडे गेलं.

शाळेजवळच्या एका छोट्याशा शेडमध्ये चंद्रप्रभाने त्यांच्यासाठी शाळा भरवायला सुरुवात केली. ही मुलं शिकली पाहिजेत, असं तिला मनापासून वाटत होतं. त्या वेळी तिचं वय होतं अवघं तेरा वर्षे! एकदा शाळा तपासणीसाठी आलेले इन्स्पेक्टर या छोट्या शिक्षिकेला पाहून बेहद्द खूश झाले होते. उन्हापावसातून दूरवर शाळेत येणाऱ्या चंद्रप्रभेची अभ्यासातली गती ओळखून तिला त्यांनी नागा मिशनरी स्कूल शिष्यवृत्ती जाहीर केली.

तत्कालीन सामाजिक प्रथेप्रमाणे चंद्रप्रभेचं लग्न फार लहान वयातच ठरवलं गेलं. नवरदेव होता एक निम्म्याहून अधिक वयाचा थोराड पुरुष! त्या वेळी जरठबाला विवाह ही फार सामान्य गोष्ट मानली जात होती. मुलींनी आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यावेत अशी सामाजिक परिस्थिती नव्हती.

पण मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना निमूटपणे सामोरी जाईल ती चंद्रप्रभा कसली! या प्रस्तावाविरोधात तिने बंड केलं आणि लग्नाला नकार दिला. पुढे एका आसामी लेखकासोबत ती काही काळ नात्यात राहिली, या नात्यातून ती एका मुलाची आई झाली, अविवाहित माता. तिने आयुष्यभर आपल्या मुलाचा खंबीरपणे सांभाळ केला.

समाजकार्याची ओढ तिच्या वृत्तीत लहानपणापासूनच होती. आता तर तिने स्वतःला पूर्णवेळ सामाजिक प्रश्‍नांसाठी वाहून घेतलं. स्त्रियांचं समाजातील विषम स्थान, त्यांच्या शिक्षणाचे आणि आरोग्याचे हक्क या प्रश्‍नांवर काम करण्यासाठी किरणमयी अग्रवाल यांच्या सोबतीने तेजपूरमध्ये महिला संघटना उभारण्याचं काम तिने हाती घेतलं.

एका बैठकीदरम्यान तिच्या लक्षात आलं, की सभेला आलेले पुरुष पुढे बसले आहेत आणि महिला पार शेवटी बांबूच्या पट्ट्यांनी बनवलेल्या पडद्यामागे बसून ऐकत आहेत. चंद्रप्रभा यांनी त्या स्त्रियांना करारी आवाजात आवाहन केलं, ‘‘ही विषमता तुम्ही का सहन करत आहात?’’ तिच्या या शब्दांनी महिलांमध्ये उत्साह संचारला. त्या बांबूचा पडदा तोडून मोकळ्या जागेत सभा ऐकायला येऊन बसल्या.

ही काही साधीसुधी घटना नव्हती. आसाममध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या पडदापद्धतीला सुरुंग लावण्याचं काम या घटनेने केलं. समाजातील पडदा पद्धती हटवण्यासाठी चंद्रप्रभा आयुष्यभर प्रयत्नरत राहिल्या. या दरम्यान राष्ट्रवादाचं लोण पार आसामपर्यंत पोहोचलं होतं. इंग्रजांना भारतातून कायमचं बाहेर काढण्यासाठी देशव्यापी प्रयत्न सुरू झाले होते. एका सभेसाठी गांधीजी तेजपूर येथे आले होते.

त्या सभेने चंद्रप्रभा यांच्या मनात स्फूर्ती जागवली. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घ्यायचं ठरवलं. स्वदेशी चळवळीत भाग घेऊन त्यांनी मदतीने स्वदेशी कापडाची होळी केली. अनेक महिलांना त्यांनी या कामी संघटित केलं. हे सगळं सुरू असताना महिलांच्या हक्कांसाठीही त्यांचं अविरत काम चालूच होतं.

त्यांनी महिला हक्कांसाठी समाज प्रबोधन करण्याकरता राज्यभर सायकलयात्रा केली. स्वातंत्र्यपूर्व भारतातील वातावरणाची एकदा कल्पना करून पाहा. म्हणजे त्या वेळी एक स्त्री राज्यभर सायकल यात्रा करते ही केवढी विलक्षण गोष्ट होती हे लक्षात येईल! अशी यात्रा करणाऱ्या त्या आसाममधील पहिल्या महिला ठरल्या.

मागासवर्गीयांना सार्वजनिक तलावावर पाणी भरण्यास त्या वेळी बंदी होती. त्यांना दुरून पाणी आणावं लागे. याविरोधात चंद्रप्रभा यांनी मोठा संघर्ष केला आणि मागासवर्गीयांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. देशव्यापी असहकार आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं.

देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम केलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आसाम विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. आसाममध्ये अशी सार्वजनिक निवडणूक लढणाऱ्यासुद्धा त्या पहिल्या महिला ठरल्या. चंद्रप्रभा सैकियानी यांनी आपलं पूर्ण आयुष्यच सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलं होतं.

आसाममध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या बालविवाह आणि बहुविवाह या अनिष्ट प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. मंदिरांत महिलांना दिल्या जाणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.त्यांच्या बहुमोल कार्याचा सन्मान भारत सरकारने त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री सन्मान प्रदान करून केला.

चंद्रप्रभा सैकियानी या झुंझार कार्यकर्ता होत्या. त्यांनी कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिला, बहात्तराव्या वाढदिवशी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. वैयक्तिक स्वार्थाला फाटा देत सामाजिक कार्यासाठी झोकून देऊन काम कसं करावं, याचा वस्तुपाठच चंद्रप्रभा सैकियानी यांनी आपल्यासमोर घालून दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture workshop : पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय करा : ढगे

Water Crisis : सिंदखेडराजा तालुक्यातील तीन गावांची टँकरने भागतेय तहान

Agriculture Officer : कृषी अधिकारी देता का? कृषी अधिकारी, २५ कृषी सहायकांकडे ८६ गावांचा भार

Water Scarcity : मराठवाड्यात १४४ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

SCROLL FOR NEXT