Cashew Crop
Cashew Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Cashew Crop : शेतकरी नियोजन पीक ः काजू

Team Agrowon

शेतकरी ः संकेत सदाशिव पवार

गाव ः खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र ः १० एकर

काजू लागवड ः ५ एकर

एकूण झाडे ः ६०० झाडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे येथे (ता. वैभववाडी) येथे संकेत पवार यांची दहा एकर जमीन आहे. त्यापैकी ५ एकरांमध्ये काजू लागवड (Cashew Cultivation) आहे. त्यात वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातींची मिळून ३०० झाडे आहेत. तर गावठी ३०० झाडे आहेत.

वेंगुर्ला जातीची झाडे २०१५ ते २०१८ च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने लावली आहेत. लागवड साधारण २१ बाय २१ आणि २५ बाय २५ फूट अंतरावर आहे. वेंगुर्ला जातीच्या काजू झाडांचे रासायनिक पद्धतीने तर गावठी झाडांचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन (Cashew Crop Management) करण्यावर भर दिला जातो.

आगामी नियोजन

सध्या बागेतील बऱ्यापैकी झाडांना फळे लागली आहेत. पुढील २० ते २५ दिवसांत काजूचा हंगाम सुरू होईल.

बागेत आतापर्यंत साधारण तीन फवारण्या घेतल्या आहेत. पुढील काळात हवामान स्थिती योग्य राहिल्यास फवारणीची आवश्यकता भासणार नाही. परंतु ढगाळ हवामानाची स्थिती राहिल्यास आवश्यकतेनुसार फवारणी घ्यावी लागेल.

सध्या बागेमध्ये दिवसातून एक वेळी फेरी मारून संपूर्ण बागेचे निरीक्षण करत आहे. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी झाडांची पाने, मोहोर, फळांचे निरीक्षण केल्यानंतर गरज भासल्यास कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.

या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजू हंगाम लांबणार आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालेल असा अंदाज आहे.

गावठी काजूचे झाडांचे उत्पादन मार्च अखेरीपासून सुरू होते. सध्या या झाडांना मोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे.

दरवर्षी सुरुवातीला वेंगुर्ला चार झाडांचे काजू परिपक्व होतात. झाडावर पूर्ण परिपक्व होऊन जमिनीवर पडलेले काजू बी गोळा केले जातात. मात्र या काळात वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो.

वन्यप्राणी जमिनीवर पडलेल्या काजूचे नुकसान करतात. त्यामुळे झाडावरच परिपक्व काजू काढण्याची कार्यवाही केली जाते. उत्पादित सर्व काजू बीची साठवणूक न करता तत्काळ विक्री केली जाते.

काजू हंगाम संपल्यानंतर देखील नियमितपणे बागेतील कामे केली जातात. बागेतील पालापाचोळा एकत्र करून झाडाच्या बुंध्यात रचला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांच्या मुळांना उष्णतेचा त्रास कमी होतो. आणि वणवे लागण्याची घटना होत नाही.

व्यवस्थापनातील बाबी

जूनमध्ये मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर गावठी आणि वेंगुर्ला जातीच्या झाडांना शेणखत दिले जाते. ही मात्रा झाडाचे आकारमान पाहून ठरविली जाते. साधारण प्रति झाड १ ते २ किलो शेणखत दिले जाते.

रासायनिक खतांचा डोस फक्त वेंगुर्ला जातीच्या झाडांना दिला जातो. साधारणपणे प्रति झाड दीड ते २ किलो १०ः२६ः२६ हे खत दिले जाते.

बागेतील सर्व पालापाचोळा गोळा करून झाडांच्या बुंध्यात रचला जातो.

रासायनिक खतांची दुसरी मात्रा प्रति झाड दीड ते २ किलो १०ः२६ः२६ प्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाऊस कमी झाल्यानंतर दिली जाते.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत बागेत तणांची वाढ झालेली दिसून येते. बागेतील तणांमुळे वणवे लागण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेतील सर्व तण ग्रासकटरच्या साह्याने काढून टाकले जाते.

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना पालवी वेळेत आली नाही. ऑक्टोबर अखेरपासून झाडांना पालवी येण्याची प्रकिया सुरू झाली.

पालवी येण्याच्या कालावधीत ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ऑक्टोबरअखेरीस

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांची पहिली फवारणी घेतली. त्यानंतर १५ ते २० दिवस संपूर्ण बागेचे सातत्याने निरीक्षण केले.

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ढगाळ वातावरणाची स्थिती होती. हे वातावरण कीड-रोगांच्या वाढीसाठी पोषक ठरते. बागेचे निरीक्षण केल्यानंतर झाडांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी शिफारशीनुसार दुसरी फवारणी घेतली.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. परंतु नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. सलग चार दिवस पाऊस सुरू होता.

याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. त्यामुळे झाडांना आलेला मोहोर कुजण्याची शक्यता निर्माण झाली होती. मोहोर टिकून राहण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी केली.

- संकेत पवार, ९०९६३७९०६६

(शब्दांकन ः एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT