Climate Change Agrowon
ॲग्रो गाईड

Climate Change : वातावरण बदलामुळे उष्णतेचा चटका तीव्र

जगभरात हवामान बदलामुळे उष्णतेचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पीक उत्पादनालाही बसला आहे.

टीम ॲग्रोवन

जगभरात हवामान बदलामुळे (Climate Change) उष्णतेचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पीक उत्पादनालाही (Crop Production) बसला आहे. विविध देशांमधील जंगलामध्ये लागलेल्या वणव्यांमुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जगभरात होणाऱ्या जीवित हानीचे प्रमाण ६८ टक्क्यांनी वाढले आहे. उष्णतेच्या लाटांचा फटका बसलेल्या नागरिकांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे ‘लॅन्सेट काऊंटडाउन’ (Lancet Countdown Organisation) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

या अहवालानुसार, २००० ते २००४ तुलनेत २०१७ ते २०२१ या कालावधीत उष्णतेमुळे सर्वाधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात सुमारे ६८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, १९८६ ते २००५ या कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि एक वर्षांहून कमी वय असलेल्या बालकांच्या तुलनेत याच वयोगटातील नागरिकांना २०२१ या एकाच वर्षांत एकत्रितपणे उष्णतेच्या लाटेच्या ३.७ अब्ज अधिक दिवसांना सामोरे जावे लागले आहे.

या अहवालामध्ये वाढत्या तापमानाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करताना कोरोनाच्या साथीचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम, युक्रेन युद्धामुळे ऊर्जेचा निर्माण झालेला तुटवडा आणि जैविक इंधनावरील वाढते अवलंबित्व या मुद्यांचाही संदर्भ घेण्यात आला आहे. -

सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ ः

‘लॅन्सेट’च्या अहवालानुसार, २०२१ या वर्षात वातावरणातील तीव्र बदलांमुळे एकूण २५३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. याचा भार सामान्य नागरिकांवर पडला आहे. विशेषत:, अल्प उत्पन्न गटातील देशांमधील विकास प्रक्रियेत यामुळे मोठा अडथळा आला आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने बाजरीच्या हंगामाचा कालावधी नऊ दिवसांनी, तर गव्हाच्या हंगामाचा कालावधी सहा दिवसांनी कमी झाला आहे. सामान्य लोकांच्या जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय, आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे.

या कारणांमुळे उष्णतेचा फटका तीव्र

- दिवसेंदिवस वाढते प्रदूषण.

- भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद.

- ग्रीस, अल्जीरिया, इटली, स्पेन, अमेरिका या देशांमधील वणव्यांमुळे उष्णतेत वाढ.

- ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, मलेशिया, पाकिस्तान, फिलिपिन्ससह इतर काही देशांत आलेल्या प्रचंड पुरामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू, लाखो जण विस्थापित.

शाश्‍वत ऊर्जेवर भर देणे आवश्‍यक ः

जैविक इंधनाच्या अधिक वापराचा निसर्गावर, आणि परिणामी तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शाश्‍वत ऊर्जेवर भर द्यावा, असे संयुक्त राष्ट्रांनी आवाहन केले आहे. मात्र, मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या देशांमध्ये उपलब्ध ऊर्जेपैकी केवळ १.४ टक्के ऊर्जा शाश्‍वत ऊर्जा स्रोतांमधून येते. मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अद्यापही आरोग्य सुविधांना २४ तास विद्युत पुरवठा नाही. दुसऱ्या बाजूला, तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या विक्रमी नफा कमवित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT