भाजीपाला पिकाचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने फायद्याचे असते.
रोपवाटिका तयार करताना भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी हंगामानुसार व भाजीपाला पिकानुसार वापरावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे. योग्य काळजी घेतल्यास भाजीपाला पिकाची रोपे ४ ते ६ आठवड्यांत लागवडी योग्य होतात. भाजीपाला पिकापैकी पालेभाज्या, गाजर, मुळा, भेंडी, घेवडा इ. बी कायम जागी लावून लागवड करतात, तर टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारख्या भाजीपाला पिकांची प्रथम रोपे तयार करून नंतर कायम जागी लावतात. रोपे तयार करण्याचे सुद्धा एक खास तंत्र आहे. भाजीपाला पिके हि हंगामी स्वरूपाची असतात. अनेक रोग व किडींना ते लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत बळी पडत असतात. रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो. रोपवाटिकेमध्ये रोपे तयार केल्यामुळे अनेक फायदे होतात. रोपांची रोपवाटिकेमध्ये स्वतंत्रपणे चांगली निगा ठेवता येते व जागेची व बियांची बचत होते आणि शेताची पूर्वमशागत करण्यास पुरेसा वेळ मिळतो. सुरक्षित जागी रोपे लावलेली असल्यामुळे पिकांची लागवड करणे शक्य होते. कोवळ्या रोपांच्या वाढीला अत्यंत पोषक अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. रोग व किडींचा वेळीच बंदोबस्त करता येतो. रोपवाटिका नेहमी पाण्याचा स्त्रोताजवळच तयार करावी. रोपे अशी तयार करावी
रोपवाटिकेकरिता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन वापरू नये. योग्य जमीन निवडल्या नंतर त्यात गुंठ्याला १ गाडी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. २० ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगारणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमीन भुसभुशीत केल्यानंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बियाणे चांगले नसेल तर भाजीपाल्याच्या लागवडीत इतर बाबीवर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते. संकरित बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. दोन ओळींतले अंतर ६ सें. मी. ठेवावे. उन्हाळी हंगामात जमिनीचा वरचा थर कडक होऊ नये म्हणून, तसेच हिवाळ्यात आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट, भात, गहू पिकाचे तूस हलके पसरावे व १० ते २० टक्के मोड दिसू लागल्यावर काढावे. बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे. बियांची पेरणी झाल्यापासून बी रुजणे, मोड येणे आणि पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना पिकानुसार ६ ते ८ दिवसांत होतात. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास ७५ टक्के नायलॉन नेट किंवा पांढरे कापड बांबूच्या साह्याने किंवा लोखंडी गज वापरून गादी वाफ्यावर दोन मी. उंचीपर्यंत ठेवून पिंजरा तयार करावा. यामध्ये रोपांची वाढ चांगली होते. तसेच रोपांचे फुलकिडे, पांढरी माशी यांसारख्या किडीपासून संरक्षण होते व विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत नाही. साधारणपणे रोपे ३-४ पानांवर असताना दोन ओळींतले तण हाताने काढावे. रोपे ३ -४ पानांवर असताना मिश्र खते प्रति वाफ्यास २० ते २५ ग्रॅम दोन ओळींमध्ये काकरी पडून द्यावी. रोपे लागवडीपूर्वीहंगामानुसार व भाजीपाला पिकानुसार रोपे ४ ते ६ आठवड्यांत लागवडी योग्य होतात. रोपांचे स्थलांतर करण्यापूर्वी एक आठवडा आधीपासून पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी म्हणजे रोपे कणखर होऊन स्थलांतरानंतर दगावणार नाहीत. स्थलांतर करण्यापूर्वी २४ तास आधी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे, म्हणजे रोप उपटताना मुळाला फारशी इजा होणार नाही. रोपांचे स्थलांतर नेहमी संध्याकाळच्या वेळेस किंवा ढगाळ वातावरणात करावे. प्रा. योगेश मेहेत्रे, ७३५०४०७२५४, (के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)