IndianMedia
IndianMedia Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

शेखर गायकवाड

गेल्या शंभर वर्षांत वृत्तपत्रांचे जगसुद्धा बदलले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर प्रभाव टाकेल अशी अतिशय निवडक वृत्तपत्रे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला होती. १७८९ मध्ये सुरू झालेले बॉम्बे हेराल्ड (Bombay Herald) हे मुंबईतील पहिले नियतकालिक होते. १८७८ मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस (Vernacular Press) ॲक्ट लागू झाला कारण त्याच वेळात अनेक भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरू झाली होती. त्यांतून ब्रिटिशांच्या चुकीच्या कारभारावर टीका होऊ लागली होती. या काळात महाराष्ट्रात टाइम्स ऑफ इंडिया (Times Of India) व कलकत्त्यात मद्रास मेल (Madras Mail)अशी अँग्लो इंडियन वृत्तपत्रे होती. बंगालमध्ये अमृत पत्रिका (Amrut Patrika) व मद्रासमध्ये हिंदू (Hindu) हे दैनिक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले.

मराठीमधील पहिले वृत्तपत्र दर्पण हे ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरू केले. हे सुरुवातीला पाक्षिक होते. त्या वेळी वृत्तपत्र सुरू करताना परदेशातील कला, विद्या आणि कौशल्य यांची माहिती वाचकांना व्हावी, त्यांचे मनोरंजन व्हावे व नव्या बातम्या त्यांना कळाव्यात असा उद्देश जांभेकर यांनी समोर ठेवला होता. त्या वेळीही कोणताही विषय न टाळता अनेक पुरोगामी विषय ते मांडत असत.

शिक्षणाचे प्रमाण एवढे कमी होते, की फार कमी लोक वृत्तपत्रे घेत. १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ती कवि रेव्हरंट ना. वा. टिळक हे ‘ज्ञानोदय’चे संपादक होते. १९४१ मध्ये ‘प्रभाकर’ हे वृत्तपत्र सुरू झाले. जगण्याची भ्रांत असलेल्या त्या काळात सर्वसामान्य लोकांना वृत्तपत्रे घेणे परवडत नसे. महत्त्वाची घटना घडली की गावातले लोक एकत्रितरीत्या वृत्तपत्राचे वाचन करत. प्रभाकर या वृत्तपत्राची वार्षिक वर्गणी ही त्याकाळी बारा रुपये होती. मुंबईनंतर महाराष्ट्रातून, पुण्यातून १८४४ मध्ये मैत्री हे मराठी वृत्तपत्र निघाले. १८४९ मध्ये ‘ज्ञानप्रकाश’ सुरू झाले.

या काळातील वृत्तपत्रांकडे पहिले असता लेखक व स्वातंत्र्य सैनिक वृत्तपत्रांशी जोडलेले होते. मराठीतील प्रख्यात कादंबरीकार हरी नारायण आपटे हे ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विष्णुशात्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले अशा प्रसिद्ध व्यक्तींनी ज्ञानप्रकाशमधून लेखन केले. स्वातंत्र्य चळवळ अतिशय जोमात असल्यामुळे राजकीय धोरणाचे प्रतिबिंब वृत्तपत्रातून व संपादकीय लेखातून दिसत असे. वृत्तपत्र हे बातम्या देणारे पत्र आहे ही जाणीव सर्वांत प्रथम काकासाहेब लिमये यांनी केली. लोकहितवादींनी हिंदुप्रकाश १८६२ पासून सुरू केले.

याच काळात ज्ञान सिंधू, विचार लहरी, हिंदूपंच व मराठा (इंग्रजी) व केसरी (मराठी) ही वृत्तपत्रे सुरू झाली. लोकमान्य टिळक हे ‘मराठा’चे पहिले संपादक होते, तर गोपाळ गणेश आगरकर हे ‘केसरी’चे पहिले संपादक होते. राष्ट्रीय चळवळीशी या वृत्तपत्रांचा अतिशय जवळचा संबंध होता. सत्तेच्या विरोधात लिहिले की त्या काळी राष्ट्रद्रोहाचे खटले भरले जात. वृत्तपत्रे मालकांना आणि संपादकांना शिक्षादेखील होत असे.

शंभर वर्षांचा वृत्तपत्रांचा आढावा घेता येणे शब्दमर्यादेमुळे अवघड असले तरी त्या त्या वेळच्या वृत्तपत्रामध्ये नेमकी मांडणी, सोपी व साधी भाषा, चौफेर बातम्या, खुसखुशीत भाषेत मायना, कौटुंबिक, धार्मिक प्रश्‍नावर भाष्य व राजकीय सभांची अतिशय सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. टिळकांच्या नंतर १९२१ मध्ये लोकमान्य हे दैनिक कृष्णाजी खांडीलकर यांनी सुरू केले व १९२३ मध्ये स्वतःचे नवाकाळ हे दैनिक सुरू केले. १९२६ मध्ये तरुण भारत हे साप्ताहिक रूपात नागपूर येथून सुरू झाले. या वृत्तपत्रांनी विदर्भातील ग्रामीण भागावर मोठा प्रभाव पडला. तसेच १९३२ पुण्यामध्ये डॉ. परुळेकर यांनी दैनिक सकाळ, १९३५ मध्ये लोकशक्ती व त्यानंतर लोकमत, पुढारी अशी अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी चार वृत्तपत्रे दलितांना न्याय देण्यासाठी सुरू केली.

आचार्य अत्रे यांनी मराठा या दैनिकाद्वारे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रखरपणे चालवली. १९४८ मध्ये मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरू झाले. शिक्षणाचे प्रमाण जसे जसे वाढले तसे वृत्तपत्रांचा खप सुद्धा वाढू लागला. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. १८७४ मध्ये महात्मा फुले व कृष्णराव भास्कर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. नागपूरमध्ये हितवाद हे साप्ताहिक सुरू झाले. शेती क्षेत्राला वाहिलेले ‘ॲग्रोवन’ हे दैनिक २००५ मध्ये ‘सकाळ समूहा’ने सुरू केले. स्वातंत्र्याच्या पूर्वी या वृत्तपत्रांचा खप काही हजारांमध्ये असे. रजिस्टर ऑफ न्यूज पेपर यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार २०२०-२१ मध्ये संपूर्ण भारतात ७५० वृत्तपत्रांनी २२ कोटी ५८ लाख प्रति दररोज छापल्याचे म्हटले आहे. त्या वर्षी १२.६० टक्के एवढी वाचकांच्या संख्येत घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रांना देखील बराच आर्थिक फटका बसला.

जास्त माहितीच्या जगात खरी बातमी कोणती असा प्रश्‍न पडू लागला आहे. कुठलेच कष्ट न करता काही कोटींची लॉटरी आपल्याला कशी लागली, असा प्रश्‍न शिकलेल्या माणसांना सुद्धा पडत नाही आणि दररोज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतचं आहे. अशा वेळी सत्य हे माहितीच्या जंजाळात कुठे तरी हरवून बसले की काय, असे मनात आल्याशिवाय राहत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT