Shrirampur News: शेतीत आधुनिकता रुजवण्यासाठी आणि ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान व ऊस उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर रयत शैक्षणिक संकुल, साई सोशल फाउंडेशन आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २२) दुपारी दोन वाजता बोरावके महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेंजिंग कौन्सिल सदस्या मीना जगधने यांनी दिली.
श्रीरामपूर येथे गुरुवारी (ता. १९) कार्यशाळेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त तथा ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीना जगधने अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
आमदार हेमंत ओगले, बारामती कृषी विज्ञान केंद्रातील मृदाशास्त्र विशेषज्ञ व एआय तंत्रज्ञान ऊस शेती मार्गदर्शक डॉ. विवेक भोईटे आणि संशोधन समन्वयक एआय तंत्रज्ञान मार्शदर्शक डॉ. योगेश फाटके यांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे.
भारत कृषिप्रधान देश असूनही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत; परंतु बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आधुनिक ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग व संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ऊस शेतीत अभूतपूर्व बदल घडवले आहेत. या प्रयोगातून उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढले.
मजुरीचा खर्च ३५ टक्क्यांनी घटला. पाण्याचा वापर ४० टक्क्यांनी कमी झाला, तर कापणी कार्यक्षमता ३५ टक्क्यांनी वाढली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवे युग सुरू केले आहे. हेच आधुनिक ज्ञान व अनुभव आता श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. एआय व आधुनिक ऊस शेती या कार्यशाळेच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे तंत्र आत्मसात करता येणार आहे. उत्पादनवाढीबरोबरच खर्च नियंत्रणही करता येणार आहे. या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.
उत्पादनवाढीचा नवा मार्ग
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी प्रभावी ठरत आहे. या पद्धतीमध्ये शेतातील निवडलेल्या क्षेत्राचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग केले जाते. नंतर त्या क्षेत्रात मॉइश्चर सेन्सर, हवामान मोजण्यासाठी यंत्रणा आणि माती परीक्षण केले जाते. या सर्व डेटाच्या आधारे कोणते पीक घ्यावे, खत व पाणी कधी आणि किती द्यावे, पिकाच्या कोणत्या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी, याचे अचूक नियोजन करता येते.
या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ, संसाधनांचा कार्यक्षम वापर, खर्चात बचत आणि शेतीच्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येते. शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवता येते असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.