Maharashtra Assembly Election Result 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Political Reactions : महाराष्ट्रातील विधानसभा 2024 निवडणूकीबाबत राजकीय क्षेत्रातून आलेल्या प्रतिक्रियांचा आढावा पाहूयात.

Team Agrowon

एकनाथ शिंदे

‘‘राज्यात हा ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजयदेखील आहे. ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली होती. लोकांनी मतांच्या रूपात प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ आणि ‘लाडका शेतकरी’ अशा सगळ्या घटकांनी महायुतीवर प्रेम दाखवले. सगळ्या मतदारांना मी धन्यवाद देतो आणि एवढ्या मतांसाठी मतदारांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे. हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. लोकांनी सुडाचे राजकारण स्वीकारले नाही. लोकसभेत फेक नेरेटिव्ह तयार केला. जनतेने पूर्णपणे विकासाला निवडले आहे.’

देवेंद्र फडणवीस

‘‘महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. जनतेने ज्या प्रकारचा विजय दिला आहे, खरंतर हा विजय जबाबदारी वाढवणारा विजय आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला खूप काम करावे लागणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वासन देतो की, त्यांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही.’’

अजित पवार

‘आमच्या सर्व योजनांची चेष्टा मस्करी केली, दोष देण्यात आला. टीका टिप्पणी करण्यात आली. मात्र त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंत कुठलाही हिशेब नसल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठे अपयश आले. आम्ही तो निर्णय मान्य केला. त्यातून सावरलो. अर्थसंकल्पात मोठ्या योजना आणल्या. त्यामधील ‘लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरली. आजपर्यंत मी राजकीय इतिहासात असा विजय पाहिलेला नाही. या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही, जमिनीवर पाय ठेवून काम करू.

उद्धव ठाकरे

एकूण आकडे दिसत आहेत ते पाहिल्यावर सरकारला अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही. विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत, असे त्यांनी ठरवले आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते की फक्त एकच पक्ष राहील. त्यानुसार, देशाची ‘वन नेशन वन पार्टी’ या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसतेय. आम्ही ज्या प्रचारसभा घेतल्या, हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाहीय म्हणून दिली की नेमकी कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नाहीय. हा निकाल अनाकलनीय आहे, यामागंच गुपित शोधावं लागेल. आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका, हा ईव्हीएमचा विजय आहे, असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही वचन देतो की आम्ही लढत राहू.”

नितीन गडकरी

“महाराष्ट्राच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठे यश मिळाले. यामध्ये विदर्भातदेखील चांगले यश मिळाले. नागपूरमध्ये देखील जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार केला गेला होता. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू, पण तो सगळा प्रचार चुकीचा होता, हे जनतेने या निवडणुकीतून सिद्ध केले. या निवडणुकीतील सर्वांत मोठी बाब ही राहिली की, शेतकरी, शेत मजूर, आदिवासी यांनी भरपूर प्रमाणात आम्हाला मतदान केले. विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांनीदेखील उत्स्फूर्तपणे मतदान केले आणि त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. मिळालेल्या जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्ट्राइक रेट देखील उत्तम होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करतो.

उद्धव ठाकरे

कोरोना काळात कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझे ऐकणारा महाराष्ट्र असा वागेल असे वाटत नाही. मी जे तळमळीने सांगत आलो ते त्यांनी मनापासून ऐकले होते. यात काहीतरी गडबड आहे. निराश होऊ नका, खचू नका, जनतेचा निकाल असेल तर तो आम्हाला मान्य आहे. मान्य नसेल तर प्राणपणाने लढत राहू. हा निकाल म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम असेल तर सोयाबीनला भाव नाही, कापूस खरेदी नाही, महिला असुरक्षित आहेत, महागाई गगनाला भिडली आहे, तरीही असे काय काम त्यांनी केले की लाट उसळली? तरीही मी त्यांचे अभिनंदन करतो. आता अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी मी आशा करतो.

रमेश चेन्नीथल्ला

हे निकाल अविश्वनीय आहेत. आम्ही याची शहानिशा करू. सर्व लोक हैराण आहेत. कुणालाच विश्वास होत नाही. आम्ही हमकात जिंकू असे वाटणाऱ्या काही जिल्ह्यांत आमची एकही जागा आलेली नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या पद्धतीने हरले आहेत हे पाहता आमचा निकालावर विश्वास नाही. महाराष्ट्राची जनताही यावर विश्वास ठेवणार नाही. नाना पटोलेंना निसटता विजय मिळवला. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार थोडक्यात वाचले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा नेता पराभूत होऊ शकतो हे अनाकालनीय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT