Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : उन्हाळी आवर्तनानंतर ‘कुकडी’त पाणीबाणी

Water Scarcity : कुकडी प्रकल्पातील धरणांतून उन्हाळी आवर्तन पूर्ण झाले असून, प्रकल्पात सध्या ५.२३६ टीएमसी (१७.६४ टक्के) इतका नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Pune News : कुकडी प्रकल्पातील धरणांतून उन्हाळी आवर्तन पूर्ण झाले असून, प्रकल्पात सध्या ५.२३६ टीएमसी (१७.६४ टक्के) इतका नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनाचा दर वाढला आहे. गतवर्षी या वेळेला प्रकल्पात ८.५३२ टीएमसी (२८.७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षाच्या तुलनेत प्रकल्पात सुमारे ३.२९६ टीएमसी (११.११ टक्के) इतका कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून एक मार्चला कुकडी डावा कालव्यात सोडलेले उन्हाळी आवर्तन १२ एप्रिलला बंद केले. जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तालुक्यांना जोडणाऱ्या २४७ किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात ३८ दिवसांत सुमारे ४.६ टीएमसी पाणी सोडले आहे. त्यामुळे येडगाव धरणाची पाणी पातळी खालावली असून, धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या सुमारे तीन हजार उपसा जलसिंचन योजनांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.

पिण्याच्या पाण्याची अडचण विचारात घेऊन कुकडी पाटबंधारे विभागाने येडगाव धरणात पाणीसाठा करण्यासाठी डिंभे धरणातून डिंभे डावा कालव्याद्वारे येडगाव धरणात ७०० क्यूसेकने पाणी सोडले आहे. डिंभे डावा कालवा ५५ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र, कालवा गळती, वहनव्यय, बाष्पीभवनामुळे सुमारे ३० टक्के पाणी वाया जात आहे.

मे महिन्यातही आवर्तन?

पाऊस लांबल्यास व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यास डिंभे धरणात शिल्लक असलेला उपयुक्त पाणीसाठा व पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठा याचा आढावा घेऊन मे महिन्यात उन्हाळी आवर्तन कसे सोडता येईल, याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाचे नियोजन सुरु आहे.

योग्य नियोजनाचा लाभ

कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने १५ ऑक्टोबरअखेर टक्के २७ टीएमसी (९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. प्रकल्पातून रब्बीचे, उन्हाळी प्रत्येकी एक आवर्तन पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांतील सात तालुक्यांना झाला आहे. यावर्षी धरणात कमी पाणीसाठा होऊन देखील पाण्याचे योग्य नियोजन केल्याने शेती पिकांसाठी उन्हाळी आवर्तनात सुमारे आठ टीएमसी पाणी सोडणे शक्य झाले.

सद्यःस्थितीत प्रकल्पातील धरणांची पाणीपातळी खालावली आहे. तापमानात वाढ झाल्याने प्रकल्पातील धरणांतील आठ दशलक्ष घनफूट पाण्याचे रोज बाष्पीभवन होत आहे.
- रवींद्र हांडे, अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT