Pomegranate  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Crop : पाणीटंचाईचे डाळिंबाच्या अंबिया बहारावर सावट

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यात पाणी संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्याचा फटका अंबिया बहारातील डाळिंबाला बसू लागला आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहूनच बागा धरण्याचे नियोजन केले असून टंचाईमुळे बहर धरण्यासाठी सावध पावले उचलली जात आहेत. यंदाच्या अंबिया बहारातील २५ हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा साधल्या जातील, अशी शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली आहे.

राज्यात डाळिंबाचे क्षेत्र २ लाख ६१ हजार इतके आहे. डाळिंबाच्या एकूण क्षेत्रात मृग, हस्त आणि अंबिया बहार धरला जातो. हस्त बहारातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. मार्च-एप्रिल अखेर या बहारातील डाळिंबाची विक्री पूर्ण होईल. डाळिंबाच्या एकूण क्षेत्रापैकी अंदाजे २० टक्के म्हणजे ५० हजार हेक्टरवर बहार धरला जातो.

या हंगामातील डाळिंबाची काढणी जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून सुरू होते. हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला चांगली मागणी असते आणि अपेक्षित दरही मिळतात. गणेशोत्सवात डाळिंबाला मोठी मागणी असते. त्यामुळे गणपतीच्या दरम्यान, डाळिंबाची विक्री करण्यासाठी बहाराचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येते.

शेतकरी जानेवारीपासून डाळिंबाचा अंबिया बहार धरत आहेत. यंदा अपुऱ्या पावसाने धरणे, मध्यम व लघू प्रकल्प भरले नाहीत. परिणामी नोव्हेंबर, डिसेंबरपासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. सिंचन योजना सुरू असून कालव्यांच्या भागातच हा बहार धरला गेला आहे.

राज्यात आतापर्यंत १० ते १५ हजार हेक्टरवरील बागांची हलकी छाटणी करून खते घालून झाडात स्टोरेज केले आहे. सध्या पाणी बंद करून बागा ताणावर सोडल्या आहेत. दरम्यान, अनेक भागात पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे हंगामात पाणी टंचाई वाढणार आहे. त्यामुळे या बहारातील ५० हजार हेक्टरपैकी २५ हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा साधल्या जाण्याची शक्यता आहे.

अंबियातील क्षेत्र मृग हंगामात वाढणार

अंबिया बहार धरला तर, पूर्ण हंगामात पाणी कमी पडले. उन्हाळी पाऊस झाल्यास थोडे का होईना पाण्याची उपलब्धता वाढेल. परंतु बहार धरण्यासाठी धोका पत्करण्यापेक्षा मृग बहार धरण्याचा विचार शेतकरी करू लागला आहे. त्यामुळे अंबिया बहारातील क्षेत्र मृग बहारकडे वळू शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी उपलब्ध कमी पाण्यावर डाळिंबाच्या बागा चांगल्या साधल्या. परंतु आता पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे अंबिया बहारातील ५० टक्के बागा साधल्या जातील. तर उर्वरित क्षेत्र मृग बहार घेण्यासाठी शेतकरी नियोजन करतील.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT