Nashik News : रानभाज्यांचे आहारातील महत्त्व आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा यासाठी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, केबीटी इंजिनीअरिंग कॉलेज जवळ, डी. के. नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवास भेट देऊन आरोग्यवर्धक रानभाज्या खरेदी कराव्यात, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले.
मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जंगलात तसेच शेतीशिवारात नैसर्गिकरित्या उगविल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यात शरीरास आवश्यक असणारे औषधी व पौष्टिक घटक विपूल प्रमाणात आढळतात. या रानभाज्यांचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत चालतो.
यात करवंदे, गुळवेल, कडूकंद, चाईचा मोहर आणि सुरण, तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, घोळ, अळू, खुरसणी, तोडली व लोथ यांचा समावेश होतो. रानभाज्यांची उगवण नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.
महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगला बाजार मिळेल, शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे योग्य भाव मिळतील व शहरी ग्राहकांना रानभाज्यांची ओळख होईल या दृष्टिकोनातून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवात रानभाज्यांच्या पाककृतीसुद्धा उपलब्ध असणार असल्याचे ‘आत्मा’चे निकम यांनी कळविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.