Dharashiv News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता सहकारी संस्थांसोबत शेतकऱ्यांनाही सभासद करून घेणार आहे. बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या संनियंत्रण समितीने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना बँकेचे सभासदत्व देण्यात येणार आहे.
बाजार समिती व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाच हक्क देण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षात झाले. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. बँकेच्या या निर्णयातून धाराशिव जिल्हा बँक सहकारात घडवून आणत असलेल्या नव्या प्रयोगाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. होम ट्रेड घोटाळ्यामुळे २३ वर्षापासून बँकेचे व्यवहार ठप्प आहेत.
गैरव्यवहारात अडकलेल्या बँकांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. यातूनच वर्धा व नागपूर जिल्हा बँकांसाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
या समितीने बँकांना चांगल्या पद्धतीने सावरल्यानंतर हाच प्रयोग सरकारने धाराशिव जिल्हा बँकेसाठी करून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे. या समितीने कामकाजाला सुरवात केली असून समितीच्या सल्ल्याने संचालक मंडळाने काम करावे, असे सरकारचे आदेश आहेत.
सभासदत्वाचे स्वरूप असे असणार
संनियंत्रण समितीच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेने शेतकरी, पगारदार कर्मचारी व ग्राहकांना दहा हजार रुपये भाग खरेदी करून सभासद होण्याचे आवाहन केले आहे. यासोबत सर्व नोंदणीकृत संस्थांनाही प्रत्येकी किमान २५ हजार रुपये भाग खरेदी करून सभासद होण्याचा पर्याय दिला आहे.
यापूर्वी सभासद असलेल्या संस्थांना कमी असलेले भाग खरेदी करून किमान पंचवीस हजार रुपये करण्यास सांगण्यात आले आहे. भागभांडवल उभारणीच्या या प्रयत्नाला जिल्ह्यातील सर्व घटकांनी प्रतिसाद दिला असून बँकेच्या बाबतीत आशादायक चित्र निर्माण झाल्याचे श्री. नाईकवाडी यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.