Thane News : शहापूर तालुक्यात आठवडाभरापासून रोज संध्याकाळी सुरू असलेल्या परतीच्या वादळी पावसामुळे शेतकरी व वीटभट्टी मालकांवर अस्मानी संकट कोसळले आहे. हाता-तोंडाशी आलेल भातपीक, भाजीपाला व वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाने उदरनिर्वाहाच्या साधनावरच कोप केल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दिवाळी आठ दिवसांवर आली असून दिवाळी कडू होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी जोर धरत आहे.
अजनुप, वेलुक, वाशाळा, बेलवड, साजीवली, किन्हवली, डोळखांब, वासिंद, खर्डी या परिसरासह ११० ग्रामपंचायती, ३६५ पाड्यांवर भातपीक, भाजीपाल्यावर रोग पडण्याची शक्यता वाढली आहे.
‘भातपीक नुकसानीची माहिती ७२ तासांत द्या’
गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस चांगलाच बरसला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. भात आणि नाचणी पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीला ७२ तासांत कळविण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आणि नैसर्गिक संकटात दिलासा देण्यासाठी २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा परतावा देण्यात येतो. या योजनेंतर्गत खरीप हंगामामध्ये ठाणे जिल्ह्यातील ७१ हजार शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा काढला आहे. जिल्ह्याकरिता युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीची भात आणि नाचणी या पिकासाठी पीक विमा योजनेअंतर्गत नेमणूक करण्यात आली आहे.
बांधावर, शेतात कापून ठेवलेले भातपीक भिजून गेल्याने मेहनत वाया गेली. उदरनिर्वाहाचे उत्पन्न वाया गेल्याने दिवाळी कडू होणार आहे. सरकारने आमच्या पोराबाळांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी मदत करावी.लक्षुमन हिलम, शेतकरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.