Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Crop Damage : खरिपाबरोबरच अवकाळीचा फटका समितीने विचारात घ्यावा

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने पहिल्या दिवशी बुधवारी (ता. १३) मालेगाव तालुक्यात पावसाअभावी करपलेले मक्याचे क्षेत्र, कापसाच्या वाळलेल्या कांडक्या, बाजरी व डाळिंब आदी पिकांच्या क्षेत्राची पाहणी केली.

समितीने शेतकऱ्यांशी चर्चा करीत मदत नक्कीच मिळणार, असे आश्वासित केले असले, तरी शेतकऱ्यांनी मात्र समितीच्या उशिरा येण्यावर नाराजी व्यक्त केली. खरिपातील झालेले नुकसान आता समितीला किती प्रमाणात दिसणार आहे, असा प्रश्न करीत लवकर यायला हवे होते. खरिपाबरोबरच अवकाळीने दिलेला फटका सर्वाधिक आहे, तो समितीने विचारात घ्यावा, असे शेतकऱ्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.

राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्य सरकारने २,२६१ कोटींची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती दाखल झाली.

समितीत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन, पुसा येथील महालनोबिस राष्ट्रीय पीक हवामान केंद्राचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे सल्लागार चिराग भाटिया यांचा समावेश आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी आहेत. समितीसोबत पोलिसांचा फौजफाटादेखील होता. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून मालेगाव, येवला व सिन्नर यांची घोषणा झाली. बुधवारी समितीने सौंदाणे, मुंगसे, लोणवाडी, चिखळओहळ, शिंदेगव्हाण, गिरणा धरण येथील पिकांची व पाण्याची सद्यःस्थिती जाणून घेतली.

सौंदाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात केंद्रीय समितीने दुष्काळ व शेतीसंदर्भात असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांनी समितीसमोर व्यथा मांडल्या. शेतकरी चेतन पवार, माधव पवार, श्रीराम पवार, शांतिलाल बच्छाव, लक्ष्मण पवार, माधव पवार यांनी शेती, पाणी, चारा, फळबाग, पीकविम्यासह विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यावर आपण केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत.

नुकसानीचे नेमके चित्र आम्ही मांडणार असून, शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. पाणी, चाऱ्याची स्थितीही समितीने जाणून घेतली. मात्र, समितीच्या या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. शेतीला सर्वाधिक फटका खरिपात बसला, आता रब्बी हंगामात आहे, त्या स्थितीत शेतकरी पिकांवर भरवसा ठेवत आहेत.

शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान हे खरीप हंगामात झाले आहे. त्यात मका, बाजरी, डाळिंब, कांदा यांचे नुकसान झाले. केंद्राचे पथक हे रब्बी हंगामात प्रकटले. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची प्रखरता त्यांना रब्बी हंगामात काय कळणार? अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या.

शेतकऱ्याने धरले धारेवर

लोणवाडे (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्याने आलेल्या पथकाला धारेवर धरले होते. तीन वर्षांपासून पीकविमा काढतो, अजून पैसे मिळाले नाही. आम्ही शेतकऱ्यांनी कांदे पिकवले किंवा चांगले उत्पादन आले की केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी करते, पहिले या प्रश्नांची उत्तरे द्या, असे मत व्यक्त केले. केंद्राने आम्हाला पूर्ण नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतात हिरव फक्त नावापुरते दिसत आहे, असे मुंगसे(ता. मालेगाव) येथील शेतकरी श्रावण सूर्यवंशी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT