Mango Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Management : अतिघन बागेत उत्तम बहरासाठीचे तंत्र

डॉ. भगवानराव कापसे

Mango Crop Management : गेल्या वर्षीची फळे काढल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने छाटणी केलेली आहे. त्यामुळे जूनमध्येच बागेमध्ये नवीन पालवी आली होती. या काळामध्ये जमिनीतील वाफसा व पावसाचा अंदाज पाहून जुलै अखेर ते ऑगस्टपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी पॅक्लोब्युट्राझॉल या वाढनियंत्रकाचा वापरही केलेला आहे.

सामान्यतः ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये आंबा झाडांना नवीन पालवी मोठ्या प्रमाणात येते. मात्र गेल्या महिन्यातील बहुसंख्य दिवसातील सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही नवीन पालवी अपेक्षित प्रमाणात आलेली दिसत नाही. आता बऱ्यापैकी उन्हे पडत असून, ही पालवी चांगल्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.

या पूर्वी आलेली आणि येणारी पालवी उत्तम प्रकारे जपण्याची गरज आहे. त्याच्या जोरावरच १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान आंबा बाग मोहरायला सुरुवात होईल. हा मोहोर संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी नोव्हेंबरअखेर उजाडलेली असेल. हे साधल्यास आपणास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फळांचे उत्पादन मिळू शकेल. हे साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.

पालवीची काळजी :

  • नवीन पालवीवर मुख्यतः रस शोषक किडी, पाने खाणारी अळी, गाॅल मीजमाशी यांचा प्रादुर्भाव होत असतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

  • पालवी पोपटी कलरची म्हणजेच हिरवी व्हायला लागताच ०-५२-३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) या विद्राव्य खताची ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. त्याच प्रमाणे ०-०-५० (पोटॅशिअम सल्फेट) ६ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एखादी फवारणी घेतल्यास पालवी लवकर पक्व होण्यास मदत होते.

  • या फवारण्यानंतरही पालवी पक्वतेपासून दूर असल्यास गरजेनुसार क्लोरमेक्वाट क्लोराईड (ॲग्रेस्को शिफारस) १.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे एखादी फवारणी घ्यावी. फारच आवश्यकता असल्यास दहा ते बारा दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यावी.

  • बाग मोहरण्याच्या तीन आठवडे आधी पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) या विद्राव्य खताची ४% प्रमाणे (४० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे) फवारणी घ्यावी. यामुळे मोहोर हमखास व अतिशय जोमदार, निरोगी बाहेर पडण्यास मदत होते.

  • बागेतील वाढलेली तणे शक्यतो मनुष्यबळाने काढून घ्यावीत. अगदीच मजुरांची अडचण असल्यास तणनाशकाचा वापर करावा. बारा ते पंधरा दिवसानंतर वाळलेली ही तणे कल्टिवेटर किंवा मोगड्याच्या साह्याने जमिनीत गाडून टाकावे. त्यामुळे त्याचे उत्तम दर्जाच्या सेंद्रिय खतांमध्ये रूपांतर होते.

  • बागेतील मशागत मोठ्या नांगराद्वारे (नऊ इंची) करणे टाळावे. कारण सहा इंचापेक्षा जास्त खोल मशागतीमुळे दोन्ही ओळीच्या मधील वाढलेली मोठी मुळे तुटण्याची शक्यता असते..

  • पावसाळा संपल्यानंतर शक्यतो ७५ ते ८० टक्के मोहोर बाहेर पडेपर्यंत बागेस पाणी देऊ नये. मात्र, अति हलक्या खडकाळ जमिनीतील बागेमध्ये गरजेप्रमाणे ठिबकने अधून मधून थोडे पाणी द्यावे. म्हणजे पाण्याअभावी झाडे सुकण्याची समस्या टाळता येईल.

  • बागेस जूनच्या सुरुवातीला शेणखत व रासायनिक खताचा डोस दिलेला असेल. आता मागील लेखातील वेळापत्रकाप्रमाणे ठिबकद्वारे शिफारशीत पद्धतीने सिंचन व खते द्यावीत.

  • वरील शास्त्रीय उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास बागेमध्ये मोहोर येण्यासंदर्भातील अडचणी कमी होतात. या वर्षीचा मोहोर नोव्हेंबरमध्ये पूर्णतः बाहेर पडलेला दिसेल, असा अंदाज आहे. अंदाज म्हणण्याचे कारण म्हणजे आपण वापरत असलेल्या व्यवस्थापनाला वातावरणाची साथही मिळावी लागते.

  • ऑक्टोबरमध्ये हवामान किती प्रमाणात कोरडे राहते, पुढे थंडी कधी सुरू होते व किती प्रमाणात पडते, अशा वातावरणाच्या बाबींवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. एखाद्या वेळेस सप्टेंबरची पालवी गेल्या वर्षासारखी थोड्याफार प्रमाणात ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. पण एकंदरीत या वर्षी आतापर्यंतच्या हवामानाच्या आधारे आपली आंबा झाडे वेळेवर आणि चांगल्या प्रकारे मोहरतील यात शंका नाही.

- डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT