Talathi Transfer Order agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Transfer Order : तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने, वशिलेबाजीला बसणार चाप

sandeep Shirguppe

Talathi Transfer Order Online : कोल्हापूर जिल्ह्यात १३० तलाठ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान तलाठ्यांच्या बदल्या करण्यासाठी वशिलेबाजी, आर्थिक उलाढाल, मर्जीतला माणूस यासह अन्य प्रकार घडत असतात. यामुळे राज्य सरकारने योग्य पाऊल उचलत पुढाकार घेतला असून, यापुढे ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे तलाठी बदल्यांमध्ये पारदर्शकता येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्ष, पीक कर्जाचा कालावधी, पूर परिस्थितीच्या तोंडावर तलाठी चावडीत असणे क्रमप्राप्त आहे. असे असताना या कालावधीत बदल्या करू नयेत, असा सूर तलाठी वर्गातून आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

२०१३ पासून प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांची पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे. तलाठी या संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर असून, आस्थापनाविषयक बाबी, बिंदू नामावली, बदली आदींबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कार्यवाही करण्यात येते.

त्यानुसार तलाठी यांना केवळ एकाच तालुक्यामध्ये पूर्ण सेवा कालवधीमध्ये काम करावे लागत होते. त्यामुळे नावीन्यता व उप्रकमशीलता याचा अभाव दिसत होता. यामुळे राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्‍चित केली. त्यानुसार तलाठी यांच्या संवर्गाचे नियुक्ती प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी हे आहेत.

वशिलेबाजीमुळे तलाठ्यांना मोठे गाव देण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी आता राज्य शासनाने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. अभ्यास गटाला येत्या १५ दिवसांत अहवाल शासनाला सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

अभ्यास गटात यांचा समावेश...

राज्य तलाठी संघटनेने महसूलमंत्री यांना निवेदन देऊन विभागीयस्तरावर बदल्या व्हाव्यात याबाबत मागणी केली होती. यानंतर सात जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता कोणत्याही तालुक्यात होणार बदली

यापूर्वी तलाठी बदलीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यांमध्येच तलाठ्यांची सेवा पूर्ण होऊन तलाठी निवृत्त होत असत. याशिवाय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून काही तलाठी चांगली गावे मिळवत असत. सप्टेंबर २०२३ मध्ये तलाठी बदल्यांचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे आता तलाठ्यांची बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात होणार आहे.

यावर कोल्हापूर जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले की, जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्यांपैकी ३० टक्के तलाठ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. कमिटीकडून अहवाल तयार केला जाणार आहे. जीआर अद्याप निघालेला नाही, बदल्यांच्या बाबतीत तयारी करून ठेवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT