Chh. Sambhajinagar News : आंबिया बहर चांगला फुटण्यासाठी वाढत्या थंडीचा फायदा होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या २० डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या बागांना ताण देता येईल. सुरुवातीच्या काळात आवश्यक खबरदारी घेतली तर आंबे बहर शेतकऱ्यांना चांगला फायद्याचा ठरेल, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्र व हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी केले.
एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी (ता. २९) मोसंबी बहर व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पाटील बोलत होते.
या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी एमजीएम हिल्सचे संचालक डॉ. के. एम. धापके यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे या वेळी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, की शेतकरी घेत असलेल्या आंबिया बहरासाठी वाढत असलेल्या थंडीचा फायदा होईल.
बहर चांगला फुटण्यासाठी थंडीची मदत होईल. सुरुवातीला शेतकऱ्यांनी झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावणे, काडी काढणे, एक टक्का बोर्डो मिश्रण फवारणी आदी कामे तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवर्जून करावीत. बागेतील पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना प्रति झाड ५० किलो शेणखत द्यावे व आंतरमशागत करावी. सुरुवातीच्या काळातील ही पावले उचलली तर भविष्यात होणारी फळगळ रोखण्यास मोठी मदत होते.
केवळ रासायनिक बाबींचा वापर करून फळगळ रोखणे शक्य होत नाही. शेणखताचा वापर व सुचविलेली सुरुवातीची कामे करणे क्रमप्राप्त आहे. हे शक्य न झाल्यास फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या पंधरवड्यात एक किलो युरिया अधिक ३० मिलि अल्फा नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड हे वाढनियंत्रक अधिक ३०० ग्रॅम बोरिक ॲसिड यांची पहिली फवारणी घ्यावी. त्यानंतर १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान पोटॅशिअम नायट्रेट दीड किलो अधिक ४ ग्रॅम जीए यांची प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.
यानंतर तिसरी फवारणी मेमध्ये फेब्रुवारीतील पहिल्या फवारणीच्या शिफारशीनुसार पुन्हा घ्यावी. यामुळे पुढे जून, जुलैमध्ये होणारी फळगळ थांबविण्यास देखील मोठी मदत होते. जोराचा पाऊस झाल्यास झाडाच्या खालच्या फळांना माती लागून ती फळे सडणे व त्यामुळे गळ होणे हा एक प्रश्न आहे.
त्यासाठी असा पाऊस झाल्यास मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी जमिनीवर घ्यावी. साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लाल कोळीच्या प्रादुर्भावाने फळ काळे होण्याचे प्रमाण वाढते. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रॉपरगाइट दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. या वेळी निमंत्रित मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.