Beed News : वाळू चोरी रोखण्यात अपयश आलेल्या एका मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दणका दिला आहे. यामुळेच महसूल कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. मात्र याकडे महसूल आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाळू वहातूक करणारे वाहने भरधाव वेगात गावातून ये-जा करत असल्याने ग्रामस्थांचे जीव धोक्यात सापडले आहेत.
या आठवड्यात बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध वाळू प्रकरणात लक्ष केंद्रित केले. बुधवारी (ता. ३) राक्षसभुवन (गेवराई) येथून वाळूचा उपसा होत असल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील एसडीएम कविता जाधव यांनी राक्षसभुवन येथे गोदावरी नदीच्या पात्रात ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली.
या पाहणीत नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याचे कविता जाधव यांना निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल एसडीएम कविता जाधव यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे सादर केला.
या अहवालात धोंडराईचे मंडळ कृषी अधिकारी पुरुषोत्तम आंधळे, राक्षसभुवन सजाचे तलाठी किरण दांडगे यांनी प्रशासकीय कामात हलगर्जीपणा दाखवत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवल्याने गुरुवारी (ता. ४) जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मंडळ अधिकारी आंधळे व तलाठी दांडगे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राक्षसभुवन प्रमाणे राजापूर येथूनही गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याने येथील संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.