Maharashtra Sugarcane News : राज्यात १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखाने जोरदार सुरू झाले आहेत परंतु ऊस तोडणी मजुरांची संख्या घटल्याने अनेक साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी मागच्या कित्येक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यावर काही अंशी तोडगा निघाला असला तरी अद्यापही काही साखर कारखान्यांनी दर दिलेला नाही. अशातच आता ऊस तोडणी कामगारांनी विविध मागण्यासाठी ऊस तोडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रात यंदाच्या साखर हंगामाला ग्रहण लागल्याची चिन्हे आहेत.
दरम्यान काल पुणे येथील साखर संकुलात साखर संघाचे पदाधिकारी व ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात चौथ्यांदा बैठक झाली. परंतु यामध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने ही चर्चा फिस्कटली. ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या २५ डिसेंबरपासून तोडणी बंद करण्याचा निर्णय ऊस तोडणी कामगार संघटनांनी घेतला आहे.
राज्य साखर संघाने मागील प्रस्तावात ३ टक्के वाढवून २७ टक्के वाढीचा प्रस्ताव मांडला. संघटना पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव ५ टक्के खाली आणून ५० टक्के वाढीची मागणी केली. साखर संघाने अमान्य करून चर्चेला बसू असे सांगितले.
त्यानंतर ऊसतोडणी कामगार सात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर संकुलाबाहेर बैठक घेत २५ डिसेंबरपुर्वी दरवाढीची पूर्तता न केल्यास ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.
बैठकीला साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष श्री ओहळ, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते. ऊसतोडणी कामगार संघटनेचे डॉ. डी. एल. कराड, प्रा.डॉ. सुभाष जाधव, दत्ता डाके, मोहन जाधव, जीवन राठोड, सुखदेव सानप आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.