Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Balaji Sutar : एका विलक्षण ‘विलक्शन’ गोष्ट

बालाजी सुतार

सांज टळून गेल्यावर गावावरची काळोखाची चादर जास्त जास्त गडद होत जाते. विजेच्या खांबांवरचे दिवे पेटतात पण त्याला काही फारसा अर्थ नसतो. त्यांचा उजेड केवळ खांब आणि त्यावरचा बल्ब दिसेल एवढाच असतो. एरवी, रात्रीचं ठेचाळत चालताना लोक अंधाराला आणि त्या बल्ब्ससकट एमेसेबीलाही खच्चून शिव्या घालत असतात. पण कधीतरी असाही एक हंगाम येतो की अनेकांना हा अंधार हवाहवासा वाटत राहतो. या हंगामात सांज होऊन रात्र चढत राहील तसतसा हालचालींना वेग येत राहतो.

पायतानांचा आवाज उमटू न देता गुपचूप गल्ल्यांमधून कधी एकटीदुकटी, कधी जथ्थ्यांनी चोरपावलं चालत राहतात. या गल्लीतून त्या गल्लीत. या घरातून त्या घरात. चहापाण्याच्या फैरीवर फैरी झडतात. काही ठिकाणी बाटल्यांच्या संगतीने खलबतखाने उभे राहतात. हंगाम ऐन भरात येतो तेव्हा तर नाना फडणवीसाला अचंब्याने तोंडात बोट घालायला भाग पडेल, एवढ्या गुप्तपणे बारभाईच्या चार पावलं पुढं जाऊन मसलती उभ्या केल्या जातात. मुत्सद्देगिरीला आणि संशयग्रस्त वातावरणाला उत येतो. रोज

एकमेकांच्या सोबतीने दिलखुलास गप्पांचे फड जागवणारी मंडळी एकमेकांकडे कान्याडोळ्याने पाहायला चालू करतात, शिवकालातल्या बहिर्जी नाईकाची आठवण यावी एवढी जबरदस्त हेरयंत्रणा गावातल्या गावातच सक्रिय झाल्याचे दिसून येते. माणसं स्वत:च्या बायकोशीसुद्धा मनातलं सगळं बोलून दाखवायला घाबरत राहतात. ग्रामपंचायतीचं ‘विलेक्शन’ लागलेलं असतं.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका हा असा हंगाम असतो की गावागावात चैतन्य सळाळू लागते. एरवी बाकीच्या निवडणुकांत गावातल्या लोकांचा सहभाग मतदानापुरता असतो. पण खुद्द गावातल्या निवडणुका लागतात तेव्हा मात्र अनेकांना सत्तासुंदरी खुणावायला लागते. गाव असतं इथून तिथवर आणि तिथली सत्ता असते चिमूटभर! पण त्यासाठी शेंडी तुटो वा पारंबी अशा निर्धाराने मोर्चेबांधणी केली जाते. सामान्यपणे गावात दोन पार्ट्या असतात. या पार्ट्यांना

राजकारणात रस असण्यामागची कारणं शोधली तर लक्षात असं येतं की ‘शुद्ध राजकारण’ ही संज्ञा इथं फारशी कार्यरत नसते. इथं खासगत भांडणांचे संदर्भ अधिक असतात. भाऊबंदकी, शेताच्या, बांधाच्या कटकटी, वर्षानुवर्षाची, पिढ्यानपिढ्या चालत आलेली दावेदारी वगैरे गोष्टींना राजकारणाचा रंग लावून ह्या नेहमीच्या कटकटी निवडणुकांच्या ऐरणीवर आणल्या जातात. निदान आमच्या गावात तरी हे असंच चालतं.

निवडणुकांचे प्रोग्राम जाहीर होतात तेव्हा या धमाल हंगामाची सुरुवात होते. आणि रोमांचक; अनेकदा थरारकही नाटकाचे प्रवेश रंगायला सुरुवात होते. उमेदवार निवडीसाठी किंवा ह्या-त्या पॅनेलकडून आपली निवड व्हावी यासाठी चालबाजी सुरु होते. अनेक इच्छुक उमेदवार दोन्ही पार्ट्यांकडे गळ टाकून बसलेले असतात. जी आपल्याला उभं करेल ती आपली पार्टी. इथे निष्ठा किंवा राजकीय विचारांशी बांधिलकी वगैरे काही प्रकार नसतो. अर्थात भारतातल्या कुठल्याही निवडणुकीत तो नसतोच.

संधिसाधूपणा हा राजकारणासाठी हवा असलेला एकमेवाद्वितीय गुण ज्यांच्या अंगात असेल ते बरोब्बर संधी साधून घेतात. यात आधीपासून गावात उतमात घडवणा-या पार्ट्या असतातच पण सबंध गावातल्या असंतुष्ट पोरांची एखादी युवक आघाडीही ऐनवेळी या दलदलीत उतरते. ज्या त्या वार्डातून ज्या त्या आरक्षणातले उमेदवार मिळाले की पार्ट्यांची रणधुमाळी चालू होते. अर्ज भरणे, ते काढून घेणे, कुणाला भरायला तर कुणाला काढायला लावणे हे प्रकार गावगुंडीचे खास प्रकार वापरून घडवले जातात आणि अर्ज मागे घेण्याची मुदत सरून गेली की मग निवडणुकीला रंग चढतो.

हा रंग केवळ ‘रंग’ नसतो, तो माज, उन्माद, उपद्रवशक्तीचं प्रदर्शन-प्रत्यंतर आणि कसलाही विधिनिषेध नसलेलं अट्टलपण अशा अनेक पदरांची गुंफण झालेला एक रगेल पीळ असतो. ‘एकच ध्यास, गावाचा विकास’ ही सगळ्याच गावातल्या सगळ्याच पॅनेल्सची घोषणा असते. एखादा ज्यादा हुशार माणूस तर ‘गांव का नेता कैसा हो? धोंडीबा पाटील जैसा हो!’ अशाही भिंती रंगवून टाकतो. नुसत्या गांवकाच नाही तर अख्ख्या देश का नेता होण्याचीही अनेकांची तयारी असते.

प्रचार चालू होतो. चहापाण्याची, दारूमटणाची आणि आश्वासनांची भरमार होते गावभर. ही आश्वासनं जर खरीच खरी झाली तर गाव जवळजवळ लंडन-पॅरिसच होणार असतं. रस्ता, पाणी, वीजेसारख्या मूलभूत गोष्टीच अजून गावभर पोहचलेल्या नसताना विमान आणि समुद्र सोडून इतर सर्व सुखसोयी गावात हमखासच आणू असे छातीठोक दावे केले जातात. आपलं जीव केवढा आणि आपण बोलतो काय याचा अजिबात ताळमेळ या बोलणा-यांकडे नसतो.

निवडणुका म्हटलं की खोटंनाटं बोलावंच लागतं अशीच सर्वपक्षीय समजूत असते. त्यात, ना बोलणा-यांना काही वावगं वाटतं, ना ऐकणा-यांना. काही लोक उघड प्रचारात हिंडू लागतात. काहीजण सुमडीत गाव ‘कोरु’ लागतात. ‘गाव कोरून काढणं’ हा वाक्प्रचार वारंवार वापरला जातो. गाव कोरणं म्हणजे विरुद्ध पार्टीला अजिबात सुगावा न लागू देता लोकांना आपल्या बाजूने वळवणं. आपण फारच चाणाक्षपणे आणि गुप्तपणे गाव कोरून काढतो आहोत, अशी खुशीची गाजरे खात हिंडणारे अनेकजण दिसत असतात.

गंमत म्हणजे यांच्या या गुप्त कारवायांची सगळ्या गावाला तंतोतंत माहिती असते. वार्डातल्या लोकांचे जातवार हिशोब मांडले जातात. कोण आपला, कोण परका याची शिरगणती केली जाते. परक्यांना आपल्याकडे आणण्यासाठी काय करता येईल याची पुन:पुन्हा चाचपणी केली जाते. दारूच्या बाटल्यांपासून महिनाभराच्या किराणा सामानापर्यंत काय वाट्टेल ते दिले-घेतले जाते. गोडीगुलाबी ते धाकदपटशा असे कैक पवित्रे आजमावले जातात. हमरीतुमरी, भांडणं, हाणामा-या या गोष्टी मुक्तहस्ते होतात.

प्रत्यक्षात यातल्या कशाचाही फारसा उपयोग झालेला नाही हे शेवटच्या दिवशी लक्षात येतं आणि प्रत्यक्ष मतदानादिवशी उभ्या असलेल्या लोकांचा धीर सुटतो. आता आयत्यावेळी कसलाही धोका पत्करायचा नाही आणि कशाही परिस्थितीत निवडूनच यायचे अशा इरेला पडलेल्या पार्ट्या शंभरापासून पाचशे-हजारापर्यंत रोकड मोजून माणसांना म्हणजे त्यांच्या मतांना विकत घेतात.

निकाल लागायचा तो लागतो. निवडून येणारी पार्टी निवडून येते, हरणारी हरते. नव्याने उमेद बांधून उतरलेल्या युवक आघाडीच्या बहुतेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं असतं. गावकीत मुरलेल्या जुन्या खोडांनी पोरांना अजिबातच मेळ लागू दिलेला नसतो. निवडणूक होते. कुणी जिंकतं, कुणी हरतं. लोकशाहीचा जयघोष केला जातो. प्रत्यक्षात तो इथल्या बेदम लोकशाहीच्या तिरडीवर आवळलेला आणखी एक सुंभ असतो. दर निवडणुकीत इथे अंतिमत: केवळ लोकशाहीच हरत आलेली आहे. लोकशाहीचं नाटक मात्र हुबेहूब रंगवलं जातं. आपल्याएवढे भोंदू नाटकी लोक जगात कुठेही सापडणार नाहीत. सध्या आमच्या गावात हे नाटक ऐन रंगात येतं आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यायेत. पात्रांनी तोंडं रंगवायला घेतली आहेत. लोकशाहीमातेचा जयजयकार घुमायला लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT