Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Jayant Patil : दिल्ली-मुंबई करणाऱ्यांनी जरा इकडेही पहावे!; पाण्याच्या टंचाईवरून जयंत पाटील यांची सरकारवर टीका

Aslam Abdul Shanedivan

Sangli/Pune : राज्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून सुमारे ६८६ गावे आणि १७२७ वाड्यावस्ता आणि पाड्यांना ८३२ टँकरवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे राज्यात भीषण पाणी टंचाई असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात गुंग आहेत. तर प्रशासन देखील निवडणुकांच्या कामात व्यस्त आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर गुरूवारी (ता.०४) टीका करताना, 'वाटाघाटीसाठी दिल्ली-मुंबई वाऱ्या करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यातील पाणीटंचाईकडे जरा लक्ष द्या. जर आधीच राज्यात धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती आली नसती', असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

पुढे जयंत पाटील यांनी, 'यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई भासत आहे. यामुळे सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जरा इकडेही पहावे!', असे म्हटले आहे. 

'सांगली, सातारा व सोलापूरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस ही स्थिती बिकट होत चालली आहे. विहिरी-तलावांनी तळ गाठला आहे. सांगली जिल्ह्यात टँकरची मागणी १३%नी वाढली आहे. वारणा धरणात केवळ २३% पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे तर मे मध्ये काय परिस्थिती असणार?' 

'मान, खटाव, आटपाडी, जत कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा या गावातील तलाव काही काळातच कोरडे पडणार आहेत. पाण्याविना जगायचं कसं? शेती करायची कशी?', असा सवाल केला आहे. तर इतक्या गंभीर मुद्द्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच 'वाटाघाटीसाठी दिल्ली-मुंबई करणाऱ्यांनी आधीच धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

दरम्यान राज्यातील सर्व धरणांतील (प्रकल्प) पाणीसाठा ३६.७१ टक्कांवर आला असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ४६.६९ टक्क्यांवर होता. मात्र वाढत्या उन्हाच्या झळा आणि गेल्या वर्षी सरासरी पेक्षा कमी झालेल्या पावसामुळे यंदा महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई समोर येत आहे. यामुळे राज्यातील ६८६ गावे आणि १७२७ वाड्यावस्ता आणि पाड्यांवर ८३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात खाजगी ७६९ आणि ६३ सरकारी टँकराच समावेश असल्याची माहिती शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 

सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने यंदा डिसेंबरमध्येच ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यानंतर एप्रिलपर्यंत वाढ होऊन ती ७३ गावे व ५२९ वाड्या झाल्या आहेत. तर आता जिल्ह्यात ७५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर २ लाखांवर लोकसंख्या बाधित झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यांत काही गावांमध्ये पाण्याची टंचाई असून येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

फक्त जत तालुक्यात ६६ टँकर

दरम्यान जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई झाली आहे. ६८ गावं टंचाईग्रस्त असून ६५ गावे आणि ४७९ वाड्यांना ६६ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. तर  आटपाडी तालुक्यात ८ गावे व ५० वाड्या पाणीटंचाईग्रस्त झाले असून येथे ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT