Indian Economy
Indian Economy  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Economy : भारत खरेच सोने की चिडिया होता का?

Team Agrowon

https://www.youtube.com/watch?v=3wa74Wt2n_E--------------------------------------
नीरज हातेकर
------------
ब्रिटीश सत्ता स्थापन होत असतानाची भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) कशी होती ? खरोखरच सोन्याचा धूर निघत होता का? नाना फडणवीसांच्या (Nana Fadanvis) वकिलाने त्यांना दिल्लीहून (Delhi) सन १७८७ साली लिहिलेले पत्र पाहू.

" पत्री आज्ञा की... पूर्वी मिनेगार दागिने करावयाचे, नक्षे कमलाचे वगैरे पाठविले, ते कोठे आहेत हे लिहून पाठवावे. यंदा मेवा, नासपाती, द्राक्षे वगैरे चांगला माल पाठवून द्यावा म्हणून पत्री आज्ञा... हल्लीं इकडील सविस्तर आमचे यजमानांस ही विनंती लिहिली आहे, त्यावरून ध्यानारुढ होईल. विलायती मेवा यंदा उशिरा आला व काहीं पाच सात उंट मार्गात लुटले गेले व गरमी चे दिवस समीप आले. एक्या महिन्याचे मुदती ने मेवा न पोहोंचे व मार्गतच सडून जाई, म्हणून विलायातेचे मेवे फरोशही सांगितले ,त्याजवरून नास पाती व द्राक्षे न पाठवली.... व मिनेगर दागिने करावयाचे नक्षे कमलाचे ते कोठे आहेत म्हणूनच पत्री आज्ञा. त्यास ते नक्षे आम्हास ठावूक नाहित... व कारागीर मीनेगार वगैरे हऱ्येक माणूस पेशजी दिल्लीस होते, ते तीन वर्ष काळ पडला, याजकरिता काहीं उपासाने माणसे मेली. काही लखनौ कडे उठोन गेली. दिल्ली आता आपण पाहिली होती तशी राहिली नाही. नजाफत व कारागिरी व चांगली वस्तु, पूर्वी आपण पाहिली आहे, त्याज प्रमाणे आता काहीं दृष्टीस पडत नाही. उगीच दिल्लीचे नाव माञ राहिले आहे "

रस्त्यांची, दळणवळणाची परीस्थिती चांगली नव्हती. मुगल साम्राज्यात किमान रस्त्यावर सुरक्षा होती तीही राहिली नाही. रस्ते भयंकर बेकार. इतके की एखाद्या प्रांतात दुष्काळ पडला तरी दुसऱ्या प्रांतातील धान्य तिकडे पाठविणे व्यापारी दृष्ट्या किफायतशीर नसे. १७८४ साली पडलेल्या दुष्काळाचे तत्कालीन वर्णन धनंजयराव गाडगीळांच्या एका लेखात आढळते ( लेखसंग्रह भाग १, पृष्ठ ८८). "या प्रांती पाऊस प्रथम आर्द्रापासून आश्लेषापोवतो काय पडला असेल. त्याजवर जोरी बाजरी पेरेच नाही जाले! हा मुलुख आधीच लुटला गेला. लोक कंगाल जाले. सांप्रत सुका पडला. या देशात लष्करात महागाई. बारा तेरा शेर धारण आज आहे. उद्या ईश्वर जाणे! अशीच गती अंतरवेद, दिल्ली, लाहोर, काश्मीर, पावतो जाली. मुलुख तिकडील उठून दक्षणेस येतात. हजारो लाखो माणूस भिकार लष्करात आले. माळव्यात जातात. अन्न मिळत नाही. उपासाने माणूस फार मरते. संहारच होऊ लागला आहे. लखनौ व श्रिकाशी प्रांती हीच दशा जाली."

दळणवळण अगदीं प्राथमिक.
त्यामुळे गावागावातून गरजेच्या अगदी प्राथमिक वस्तू निर्माण होत. बलुतेदारीतील तंत्र शेकडो वर्ष बदलले नाही. हे लोक आनंदाने, स्वखुशीने वगैरे करत नव्हते. पर्यायच नव्हता दुसरा. पुढे जेंव्हा इतर काहीं व्यवसायात मागणी वाढून चांगल्या संधी उपलब्ध झाल्या, तेंव्हा ज्याना शक्य होते ते परंपरागत धंदे सोडून तिकडे गेले. पण हे नंतर झालं. ब्रिटीशपूर्व व्यवस्थेत ग्रामीण कारागिरांना ही संधी अभावानेच मिळत असे. नवीन उत्पादने, तांत्रीक विकास हा शहरातून होत असे. कारण तिथली बहुसांस्कृतिकता आणि स्केल. दिल्लीचा ऱ्हास झाला तसे कलाकार लखनौ, हैद्राबाद, ग्वालियरला वगैरे गेले. पण राजकीय अस्थिरता प्रचंड. म्हणून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वगैरे होऊ शकत नव्हती. शेती अगदीं बेसिक. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी राज्यकर्ती तर झाली, पण फायद्यात नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एम. ए. च्या प्रबंधात संपूर्ण आकडेवारीच दिलीय.

१८५८ पर्यंत फार थोड्या वर्षात कंपनीचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक होते. बाकी वर्ष तोट्यात. खर्च प्रामुख्याने लढायांवर, सैन्यावर. कर उत्पन्न कमी, कारण एकूणच अर्थव्यवस्था कमजोर. त्यामुळे कंपनी कर्जबाजारी. परदेशातून उचललेली कर्जे फेडणे इथल्या पैशातून. वित्तीय नियोजनाची बोंबाबोंब. पण कंपनी कोसळली तर सगळे कर्ज देणारे गोत्यात येतील म्हणून भारतात राणीचे राज्य आणायची चर्चा १८५८ च्या आधीच सुरू झाली होती. बंडामुळे हे हस्तांतर लगेच झाले.

भारत ही सोन्याची चिडिया होती, सोन्याचा धूर निघत होता वगैरे मनाला बरे वाटते पण तसे नाहीये.
(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT