
परभणी ः ‘‘विविध पिकांच्या उत्पादकता (Crop Productivity) वाढीसाठी शुद्ध बियाणे, दर्जेदार कृषी निविष्ठा (Agriculture Input) तसेच सुधारित पीक व्यवस्थापन (Crop Management) तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.
कोरोना काळात कृषिक्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेस तारले. यातून शेतकरी हेच समाजाच्या प्रगतीचे केंद्र बिंदू आहेत, हे सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मंगरूळ (ता. मानवत) येथे शेतात जाऊन डॉ. मणी यांनी मंगळवारी (ता. ८) शेतकऱ्यांशी संवाद साधला.
भारतीय किसान संघाचे सरसंघटन मंत्री दादा लाड, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्रगतिशील शेतकरी अशोक दशमाने, मधुकर जाधव, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, रेशीम शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. अनंत लाड, गुलाब शिंदे, रघुवीर नाईक आदी उपस्थित होते.
एकाच दिवशी ६० गावांत कृषिशास्त्रज्ञ
मंगळवारी (ता. ८) एकाच दिवशी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील ६० पेक्षा जास्त गावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या अंतर्गत २५ पथकांमध्ये १२५ शास्त्रज्ञांचा समावेश होता. शेतकऱ्यांकडून कृषी विषयक समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना आधुनिक कीड, रोग, पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती दिली गेली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.