Jowar crop Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Irrigation : ज्वारीस द्या संरक्षित पाणी

Article by Dr. Adinath Takte : साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते. या वेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकाची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी पाण्याची सोय असल्यास संरक्षित सिंचन करावे.

डॉ. आदिनाथ ताकटे 

Management of Jowar Production : सध्या बहुतांश ठिकाणी ज्वारी पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. पीक पोटरी अवस्थेत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात पिकाची पाण्याची गरज वाढते. या काळात ओलाव्याची देखील जास्त गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात जास्तच घट येते.

कोरडवाहू ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता ही प्रामुख्याने जमिनीतील साठविलेल्या ओल्याव्यावरच अवलंबून असते. जमिनीवरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यास जमिनीस भेगा पडतात. ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात होते.

साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते. या वेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकाची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी पाण्याची सोय असल्यास संरक्षित सिंचन करावे.

या काळात पिकास पाणी मिळाल्यामुळे ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्ये ताटातून कणसांत जाण्यास मदत होते. तसेच कणसांचा आकार मोठा होण्यास मदत मिळते. त्यामुळे पिकास वाढीच्या महत्त्वांच्या अवस्थांमध्ये सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे

आंतरमशागत

सद्यःस्थितीत राज्यातील बहुतांश लागवड ही पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे बहुतांश ठिकाणच्या जमिनीस मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. पोटरी अवस्थेत असणाऱ्या पिकास दातेरी कोळप्याने कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. या वेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणे अवघड जाते.

दातेरी कोळप्याच्या दातऱ्याचा कोन कोळपे ओढण्यास सोपा जाईल असा असावा. दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते. या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोऱ्यास मदत होते. त्यानंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था पूर्ण होते. एकंदरीत ज्वारीच्या पिकास तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या आठवड्यांतील कोळपणीमुळे पिकास नक्कीच फायदा होतो.

बागायती ज्वारीस दिलेल्या एकूण पाण्यापैकी ७० टक्के पाणी जमिनीच्या पहिल्या ३० सें.मी. थरातून, १६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून, ९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले ५ टक्के पाणी चौथ्या थरातून पिकास उपलब्ध होते. जमिनीच्या सुरुवातीच्या ३० सें.मी. थरांत पिकाची ६० टक्क्यांपेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते.

सिंचन व्यवस्थापन

बागायती रब्बी ज्वारीस पीकवाढीच्या महत्त्वाच्या चार अवस्थेत आहेत. या अवस्थांमध्ये पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र भारी, काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावे.

पाणी देण्याच्या अवस्था

ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी

पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी

पीक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी

कणसात दाणे भरण्याचा काळ पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी

वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेतील सिंचन

सर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी पीक फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पुरेसे पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते. तसेच कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढ मिळते. सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असल्यास पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

ज्वारी पिकाची पेरणी झाल्यानंतर ९० ते ९५ दिवसांत दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. याकाळात पिकाची पाण्याची पाहून चौथे पाणी द्यावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारी पिकास या अवस्थेत पाण्याची गरज भासते.

भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते. आणि गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. त्यामुळे ज्वारी पीक लोळण्याचे प्रमाणात वाढ होते. भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन, चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.

कोरडवाहू ज्वारी पिकास संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर ठरते. कमी पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचनाने पिकाची पाण्याची गरज भागविणे शक्य होते. मात्र एक पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी दिल्यास पिकाची वाढ चांगली होऊन हमखास उत्पादन मिळू शकते.

दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी २८ ते ३० दिवसांनी व दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. या प्रमाणे संरक्षित पाणी दिल्यास पिकाच्या एकूण उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ मिळते.

कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाणी देण्याची सोय असल्यास गर्भावस्थेत पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी सिंचन द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत पाणी द्यावे.

मध्यम जमिनीत बागायती लागवडीस तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. भारी जमिनीत चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT