Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

गावच आपल्याला पोटात घेतं

आता गावं पहिल्यासारखी राहिली नाहीत,' 'आता गावातल्या घराघरांवर डिश लागल्यात,' 'गावात गेलं तर आता पायाला माती लागत नाही, कारण सिमेंटचे रस्ते झालेत,' 'गावातल्या प्रत्येकाकडं मोबाईल आलेत.' 'पूर्वी गावात फक्त मुक्कामी एसटी यायची आता काय घरोघर गाड्या झाल्यात...'

टीम ॲग्रोवन

देवा झिंजाड

'आता गावं पहिल्यासारखी राहिली नाहीत,' 'आता गावातल्या घराघरांवर डिश लागल्यात,' 'गावात गेलं तर आता पायाला माती लागत नाही, कारण सिमेंटचे रस्ते झालेत,' 'गावातल्या प्रत्येकाकडं मोबाईल आलेत.' 'पूर्वी गावात फक्त मुक्कामी एसटी यायची आता काय घरोघर गाड्या झाल्यात...' ही व इतरही अनेक वाक्ये काही शहरी मंडळींकडून गावाबद्दल नेहमी ऐकायला मिळतात. पण मी म्हणतो गावात ह्या सुधारणा होणं किंवा गावच्या लोकांच्या राहणीमानात बदल होत जाणं हे चांगलं नाहीय का? ग्रामीण भागात जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या सुटून त्याचंही जगणं सुकर जर झालं तर त्यात काय बिघडलं?

मी लहान असताना आमच्या गारखिंडीतून अळकुटीला जाणारा रस्ता खूपच खराब होता. त्यावेळी एका 'अडलेल्या' बाईला खटारगाडीतून दवाखान्यात नेताना उशीर झाल्याने जीव गमवावा लागला होता. मग ह्या पायाभूत सुविधा सुधारू नयेत का? की सगळं काही शहरात व्हावं असं वाटतं ह्या मंडळींना? खरं तर अशी माणसं मला लबाड वाटतात अन् त्याचं कारण म्हणजे अशी माणसं स्वतः मात्र शहराच्या मिठीत राहतात अन् गावावर टीका करत सुटतात. शहरात समस्या नाहीत ह्या मताचा मीही नाही.

बरं जर त्यांचं गावावर एवढंच प्रेम असेल, तर मग ते महाभाग कायमचं गावात का बरं राहत नाहीत? त्यांचा हा दुट्टपीपणा मनाला खूप दुखावून जातो. सगळ्यात जास्त राग त्यांचा येतो ज्यांचं बालपण व सगळी जडणघडण ही गावच्या मातीत झालीय. अन् तेसुद्धा गावच्या आधुनिक बदलांना सहजपणे का बरं स्वीकारत नसतील? अशा मानसिकतेची लोकं जेव्हा गावाकडे जाताना अर्धा किलो/पावशेर खाऊ घेऊन जातात अन् गावाहून परतताना मात्र पोत्यापोत्यानं धनधान्य, भाजीपाला घेऊन येतात.

शहरात ठीक आहे पण गावातसुद्धा शर्ट 'इन' करून जेव्हा ही मंडळी फिरतात तेव्हा ह्याच मंडळींना लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलेल्या म्हाताऱ्या माणसांशी बोलायचीसुद्धा लाज वाटते. अशी 'जुनी' माणसं दिसली की ही शहराचा वारा लागलेली माणसं त्यांना टाळू लागतात. तरीही हा कृतघ्नपणा गाव अन् गावातली माणसं समजून घेतात. त्यामुळेच आई, वडील अन् आपल्याला ज्या गावपांढरीनं पोसलं तिला विसरू नका एवढीच कळकळीची विनंती. कारण आपण जगात पोटासाठी कुठंही फिरलो तरी शेवटी गावाशिवाय दुसरं कुणीच आपल्याला मायेनं पोटात घेत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT