Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : कर्म...

Team Agrowon

समीर गायकवाड

Sameer Gaikwad Article : सुनांचं भांडण विकोपाला गेलं, एका घरात चार चुली झाल्या. भिडस्त स्वभावाचे नवरे आणि सासरा निव्वळ बघे झाले. अखेर वाटणी करायचं ठरलं. गंगूनं लाख बोंब मारून बघितली, पण तिच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही. भावकीकडून सांगून झालं, पाव्हण्या-रावळ्यांनी शब्द टाकून बघितला, पण सगळं व्यर्थ! अखेर गंगूनं सरपंचांकडे धाव घेऊन पंचायत बसवून घरातला तंटा मिटवायला सांगितलं.

अलीकडे राउताच्या घरी सकाळपासूनच भांडण लागायचं. तिन्ही सुनांच्या कालव्याला म्हातारी गंगू कातावून जायची. घरी बायकांचा धुरळा उठायचा, तेव्हा ज्ञानू राऊत कुठंतरी उलथलेला असे. आपणच तिन्ही सुनांच्या तोंडाला लागतो, आपला कारभारी आपली बाजू घेत नाही असं गंगूला वाटायचं. तिच्या लेखी ज्ञानू म्हणजे ‘अंडं म्हणजे उंबर आणि ससा म्हणजे सांबर’ अशा बैलबुद्धीचा माणूस होता. ज्ञानू भोळसट होता.

व्यवहारात कमी होता. मनानं मात्र सच्चासीधा होता. लोकांची भांडणं मिटवायला जाणं हा त्याचा आवडता उद्योग. पण व्हायचं असं, की तो जायचा तंटा मिटवायला आणि गव्हाची कणिक करून यायचा. लग्न झाल्यापासून ज्ञानू गंगूच्या पदराला बांधून होता. तिच्या तोंडाची टकळी चालू झाली, की आढ्याला नजर लावून मुकाट बसायचा. ‘चूक झाली, इथून पुढं गप राहतो’ असं म्हणणारा ज्ञानू बदलत नव्हता.

ज्ञानूचं खानदान नावाजलेलं होतं, शिवाय जमीनजुमलाही भरपूर होता. पोरंदेखील मेहनती होती, दिवसभर राबराब राबून त्यांनी मातीतून सोनं पिकवलं होतं. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. त्यामुळं मुलांना चांगल्या सोयरिकी आल्या. थोरल्याचं, मधल्याचं लग्न एका मांडवात थाटात लावून दिलं. तिन्ही मुलांच्या पाठीवर काहीशा उशिराने झालेली अनसूया ही ज्ञानूची एकुलती पोर. त्यामुळं गंगूबाईचा जीव तिच्यावर अंमळ जास्तीच होता. धाकट्या पोराचं आणि अनसूयेचं लग्न एकाच मांडवात झालं. अनसूयेनं आपल्या आईचे सगळे गुण घेतले होते, त्यामुळे ज्ञानूला तिची काळजी असायची.

बक्कळ हुंडा देऊन गोरख भोसल्यांच्या तालेवार श्रीमंत घरात तिला दिलं होतं. ती भोसल्यांची लाडाची सून झाली होती. जवळच्याच गावात राहणारा गोरख हा ज्ञानूचा चांगला मित्र असल्याने ज्ञानूची चिंता मिटली होती. तर लाडकी लेक जाऊन धाकटी सून घरात आली, तेव्हा गंगूबाई काहीशी चिडखोर झाली होती. या दोन्ही लग्नांत ज्ञानू निव्वळ भालदार चोपदारागत उभा होता. सगळा कारभार वरमाईच्या हाती होता. गावालाही हे ठाऊक असल्यानं नवल वाटत नव्हतं. कजाग, हेकेखोर स्वभावाच्या गंगूबाईला ज्ञानूनं कधी दुखावलं नव्हतं. त्याची मुलं देखील त्याच्याच वळणावर गेली होती. आईच्या शब्दापुढं जायची त्यांची मजल नव्हती. खरं तर त्यांना आपल्या बापाबद्दल सहानुभूती वाटायची.

अनसूयेचं लग्न झाल्यावर तिचं माहेरी ‘येती जाती’ करून झालं, द्येव द्येव झालं, ‘धोंड्या’चं कौतुक झालं, दिवाळसणासह हरेक सणवाराला चोळीबांगडी देऊन झाली. बघताबघता अनसूयेच्या लग्नाला पाचेक वर्षं उलटून गेली. तिला दोन अपत्यं झाली. दोन्ही बाळंतपणाला माहेरी आल्यावर आईसोबतचं तिचं मेतकूट पक्कं झालं. कुठल्या ना कुठल्या कारणानं अनसूया माहेरी यायची. आईच्या कानाला लागायची.

माजघरात खेटून बसत चोरट्या आवाजात दोघी मायलेकी कुचूकुचू करत बसायच्या. रडक्या तोंडानं माहेरी आलेली अनसूया परत जाताना खुश दिसायची. मधल्या काळात गोरख भोसल्यांनी दोन-तीन वेळा ज्ञानूला बोलवून घेतलं, नंतर एकेक करून ज्ञानूच्या पोरांनाही भेटीचे सांगावे धाडले. ज्ञानूची मुलंही त्यांच्याकडं जाऊन आली. तिकडून येताच त्यांचे चेहरे पडलेले असायचे. अनसूया माहेरी आल्यावर तिला बगलेत घेऊन बसणारी, गोडधोड खाऊ घालणारी गंगूबाई सुनांना मात्र हिडीसफिडीस करायची. त्याही बापड्या ऐकून घ्यायच्या. सासूच्या, नणंदेच्या पुढंपुढं करायच्या.

यंदाच्या वर्षात मात्र काही तरी बिनसलं. गंगूच्या सुनांची आपसांत कळवंड लागायची, अंगावर धावून जात झिंजा उपटायच्या. त्यांचा रौद्रवतार पाहताच गंगूबाईची बोबडी वळायची. इच्छा असूनही ती मध्ये पडू शकत नव्हती.

चुकून तिनं मध्यस्थी केलीच, तर तिचेच भुस्कट पडे. पुढे जाऊन सुनांचा कज्जा इतक्या विकोपाला गेला, की त्यांनी वायलं काढून द्यायचा धोसरा लावला. ज्ञानूच्या घुम्या स्वभावानं घर तुटतं की काय या भीतीनं गंगूबाईला पुरतं ग्रासलं. मेंदूचा गरगटा झालेली गंगूबाई कावून शेताकडं निघून जायची.

गंगूची पावलं मोजत ज्ञानू शेताकडे जायचा. धोंडीच्या माळावर लिंबाच्या झाडाखाली गुडघं दुमडून बसलेल्या गंगूजवळ अल्लाद जाऊन बसायचा. वारं सुसु करत कान भरायचं, गरम धुरळा पाला पाचोळ्यासंगं उडत इकडून तिकडं घुमायचा. नवरा आल्याची जाणीव होताच गंगूनं त्याच्याकडं न बघता पदर ठीकठाक करत त्याचं एक टोक दातात धरत दुसरीकडनं कपाळावरून खाली ओढायची.

गुडघ्याभोवती हाताची मिठी करायची जोडवी मातीत रुतली तरी बोटांनी माती टोकरायची. ज्ञानू घसा खाकरायचा. हात झटकून सभोवताली पाहत ठस्कून बघायचा. पण गंगू बधत नसायची. काही क्षण शांततेत जायचे. ज्ञानूने हळूच स्पर्श करताच मोठ्या फणकाऱ्याने तिने तोंड फिरवायची. ‘एव्हढा राग बरा नव्हं’ म्हणत गोडीगुलाबी करायचा. मग ती म्हणायची, ‘एक टाचकं कुठल्या सुनंला उचलाया लावू नगासा.

कडबा कुट्टी दिकून मी करीन पर कुटल्या सुनेला अन् कोणत्या लेकाला वाडं कापाया सांगू नका. सगळी कामं मी करीन. अजून मी मोप धडधाकट हाय, मला इतक्यात धाड भरत नाय. रक्ताचं पाणी करीन पर तुमी माझं ऐका. एक गुंठा दिकून कुणाच्या नावावर करू नका. आपण इथंच वस्तीवर राहू.’ एका दमात काळजातलं ओठावर आणायची. ज्ञानू सुस्कारा सोडत होकार द्यायचा.

पण त्याच्यानं काहीच होणार नव्हतं. आणि झालंही तसंच. सुनांचं भांडण विकोपाला गेलं, एका घरात चार चुली झाल्या. भिडस्त स्वभावाचे नवरे आणि सासरा निव्वळ बघे झाले. अखेर वाटणी करायचं ठरलं. गंगूनं लाख बोंब मारून बघितली, पण तिच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही. भावकीकडून सांगून झालं, पाव्हण्या रावळ्यांनी शब्द टाकून बघितला पण सगळं व्यर्थ! अखेर गंगूनं सरपंचांकडे धाव घेऊन पंचायत बसवून घरातला तंटा मिटवायला सांगितलं.

संक्रातीच्या दिवशी पंचायत बसायची ठरली. आपल्या घरात चाललेल्या घडामोडींनी अनसूयादेखील भांबावून गेली होती. संक्रातीच्या आदल्या रात्रीच ती माहेरी आली. ती येताच गंगूनं सगळा पाढा तिच्यापुढे वाचला. पण आता वेळ टळून गेली होती. गंगूला हा आपला पराभव वाटत होता. आता गाव आपल्याला घाबरणार नाही, आपल्याला किंमत नसणार याचं तिला शल्य वाटू लागलं. अखेर तिनं एक निश्‍चय केला. पहाटेच उठून तिनं सगळ्यांच्या आधी आवरलं.

सुना झाडलोट करत असताना तिची वेणीफणी उरकली. सडा सारवण करणाऱ्या सुनंपाशी जाऊन ती उपहासाने हात जोडत म्हणाली, ‘‘बायांनो आता खुशाल भांडत बसा. मी जात्ये जीव द्यायला...’’ तिला वाटलं की हे ऐकताच सुना आपल्याला अडवतील, गयावया करतील. मग आपण तंटा मिटवू. पण झालं उलटंच. सुनांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गंगू चडफडत निघून गेली. ती गेल्याचं कळताच अनसूया ऊर बडवून घेऊ लागली.

जीव द्यायचा म्हणून गंगू घरातून निघून गेली खरी, पण तिची पावलं रेटत नव्हती. वाटेतल्या वस्त्यांवर थांबत, नजर मागं ठेवत बऱ्याच वेळानं ती रवाना झाली. आपल्याला अडवायला कुणी तरी येईल ही तिची आशा फोल ठरली. उदास मनानं जड पावलांनी ती चालत राहिली, वाटंतला फुफाटा पायावर साचला.

पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळ कंबरेपर्यंत आले. केस विस्कटून गेले. वाऱ्यावर फडफडणारा पदर आवरायचं भानही तिला राहिलं नव्हतं. अंग थरथरत होतं, श्‍वास वेगानं होत होते. मान लटपटत होती. रोजची पायाखालची वाट असूनही शेताच्या निसरड्या बांधावरून जाताना ती घसरत होती. आपल्याच तंद्रीत होती ती. एकाएकी ज्ञानूचा आवाज कानी आला- ‘‘कारभारीण बाई, औ कारभारीण बाई.’’ आणि तिची तंद्री भंग पावली. तिच्या समोरच ज्ञानू आणि व्याही गोरख भोसले उभा होता.

असं अवकाळी वख्ताला आपल्या व्याह्याला शेतात पाहून गंगूबाई वरमली. पदर डोईवरून घेत पावलं चोरून घेत ती जागीच थबकली. प्रश्‍नार्थक मुद्रेने तिने ज्ञानूकडे पाहिलं. काही क्षण निःशब्द गेल्यावर गोरखच बोलला, “अवो ताईसाब, जीव द्येयाची काहीच जरूर नाही, सगळं नाटक होतं ह्ये ! तुमच्या सुना तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. पण मीच त्यास्नी गळ घातली.’’ गंगूबाई आता पुरती चक्रावून गेली. पाव्हणा कोडं का घालतोय हे तिला उमगत नव्हतं. तिचा प्रश्‍नांकित चेहरा पाहून गोरख म्हणाला, ‘अनसूयेने आमच्या घरात ह्येच कुटाणा क्येला.

तिला वायलं काढून पायजे होतं. तिच्या डोस्क्यातली माती टोकरून बघितली, तर तुमचं नाव म्होरं आलं. तवा आधी ज्ञानूशी बोललो, मग तुमच्या मुलास्नीबी बोललो. मंग हे सगळं ठरलं. तुमच्या कर्माच्या पेरणीचा फेरा कधी न कधी तुमच्याकडं येणारच की! आता तुमचं घर फुटतंय याचं अनसूयेला वाईट वाटतंय नव्हं, तसं आमचं घर फुटताना आमाला बी वाईट वाटतं, तकलीफ हुत्ये. तवा तिला चार शब्द समजावून सांगा. तिला उद्याच सासरी लावून द्या. मी आल्या पावली माघारी जातो. उगाच चर्चा नको व्हायला.’ एका दमात गोरख बोलला. खाली मान घालून उभ्या असलेल्या गंगूला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

दुसऱ्याच दिवशी आपला बाडबिस्तरा गुंडाळून अनसूया सासरी गेली ती लवकर आलीच नाही. इकडे राउतांच्या घरी ज्ञानूच्या शब्दाचं वजन आस्ते कदम वाढत गेलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT