Groundnut Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Yield Drop : भुईमूग उत्पादनाला तापमान वाढीचा फटका

Heatwave Crop Damage : विदर्भात कापसासोबतच खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक राहते. कपाशी ४२ ते ४५ हेक्‍टर तर सोयाबीन ४० ते ४१ हेक्‍टरवर राहते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : उन्हाळ्यात हुकमी पीक ठरलेल्या भुईमुगाला यंदा मात्र वाढत्या तापमानाबरोबरच कीड-रोगांचाही फटका बसला. त्याच्या परिणामी विदर्भातील अनेक जिल्ह्यात भुईमूग उत्पादकता प्रभावीत होत २० क्‍विंटलवरून २ ते ४ क्‍विंटलवर आली आहे. त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

विदर्भात कापसासोबतच खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक राहते. कपाशी ४२ ते ४५ हेक्‍टर तर सोयाबीन ४० ते ४१ हेक्‍टरवर राहते. बाजारात मिळणारा दर, उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक या कारणामुळे या दोन्ही मुख्य पिकांच्या क्षेत्रात एक ते दोन हेक्‍टरची दरवर्षी तफावत राहते. सोयाबीननंतर रब्बी हरभरा घेत विदर्भात उन्हाळी पीक म्हणून शेतकऱ्यांची भुईमुगाला पसंती आहे. कृषी विभागाच्या लेखी विदर्भातील ११ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार हेक्‍टरवर उन्हाळी भुईमूग घेतला जातो.

परंतु एकंदरीत स्थिती पाहता विदर्भातील भुईमूग लागवड ही ५० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाकडून केला जात आहे. त्यावरूनच हे पीक गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचे कारण ठरल्याचे स्पष्ट होते. या पिकातून अपेक्षित उत्पादकता आणि उत्पन्न मिळविण्यासाठी लागवड कालावधी साधणे क्रमप्राप्त ठरतो.

कारण त्यानंतर विदर्भातील अति तापमानाचा फटका बसत फुलांचे शेंगात रूपांतर होत नाही. यंदा त्याच कारणामुळे एकरी वीस क्‍विंटल उत्पादकता देणाऱ्या भुईमुगापासून शेतकऱ्यांना अवघे दोन ते चार क्‍विंटल इतकेच उत्पादन झाले.

परिणामी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणाच्या परिणामी जमिनीच्या आतील बाजूस आर्दता वाढल्यास त्यातून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत त्याद्वारेही पीक उत्पादकता प्रभावीत होते, असेही कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाचे डॉ. संतोष गहूकर यांनी सांगितले.

विदर्भात वाढले क्षेत्र

तेल्हारा, बार्शीटाकळी (अकोला), मेळघाट (अमरावती), हरिसाल, सातपुडा पायथा, हिंगणघाट (वर्धा), यवतमाळ या भागात भुईमूग लागवड क्षेत्रात सातत्याने वाढते आहे. एकरी वीस क्‍विंटलची उत्पादकता घेणारे शेतकरी आहेत. सरासरी सहा ते साडेसहा हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळतो. २५ ते ३० हजार रुपयांचा उत्पादकता खर्च आहे. अवघ्या तीन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी याकडे वळले आहेत, अशी माहिती डॉ. संतोष गहूकर यांनी दिली.

विदर्भात नजीकच्या काळात फुलधारणेच्या अवस्थेत तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहते. परिणामी फुलांचे शेंगामध्ये परिवर्तन होत नाही. हा धोका लक्षात घेता एक ते १५ जानेवारी याच दरम्यान लागवड करावी. मार्च किंवा एप्रिल १५ पर्यंत पीक काढणीस आले पाहिजे. त्यामुळे तापमानाचा फटका बसणार नाही. सोयाबीन काढणीनंतर शेतकरी हरभरा लागवड करतात. याच्या काढणीला उशीर झाल्यास भुईमुगाचा हंगाम लांबतो. परिणामी कीड-रोगांचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास त्याचाही परिणाम भुईमूग उत्पादकतेवर होतो.
- संतोष गहूकर, प्रमुख, तेलबिया संशोधन विभाग, पंदेकृवि, अकोला
अडीच एकर क्षेत्रावर भुईमूग लागवड केली होती. शेंग काढणीचा मजुरी दर वाढलेला असताना काही कारणामुळे शेंगधारणाच झाली नाही. परिणामी उत्पादकता खर्चाची भरपाई होणेही शक्‍य वाटत नाही.
- भुजंग जाधव, शेतकरी, कवडीपूर, ता. पुसद, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT