Nandurbar News : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवरील भगदाड पडलेल्या पुलाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, भगदाड पडलेल्या ठिकाणी भरावाचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी पुलाच्या खालचा बाजूस दगडी पीचिंगचे काम सुरू आहे.
पुलाचे काम भक्कम व्हावे म्हणून इतरही कामे केली जात आहेत. पुलाच्या दुरुस्तीचे काम बघता लवकरच पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तापी नदीला आलेल्या महापुरामुळे पुलाला भगदाड पडून नदीपात्रातील कप्प्यांमधील भराव वाहून गेला होता. शिवाय पुलाखालील दगडाच्या पिचिंगसह भराव वाहून गेल्याने पुलावरील वाहतूक १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे.
दोंडाईचा-धुळेकडे जाणारी वाहतूक शिरपूर व नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्याने वाहनधारक व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वेळही वाया जात आहे. लवकरात लवकर पुलावरील वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केले जात आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत हलकी वाहतूक सुरू केली जाईल, असे लेखी आश्वासन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार यांनी शहादा येथे रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांना दिले आहे. त्या आधारावर अहोरात्र दुरुस्तीचे काम केले जात आहे.
दुरुस्तीसाठी सर्व प्रकारची यंत्रणा राबविण्यात येत आहे. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.भगदाड पडलेल्या कप्प्यांमध्ये भराव करण्यात आला आहे.
पुलाखालील भरावही दगडांचा वापर करून केला जात आहे. पुलाचे संरक्षक कठडे दुरुस्त करून रंगकाम केले जात आहे. पुलाचे काम झाल्यानंतर पुलाच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. किती वजनाच्या क्षमतेची वाहने पुलावरून जाऊ शकतात, याची खात्री केली जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.