Agriculture MSP
Agriculture MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season MSP : हमीभावात पुन्हा जुमलेबाजी

Team Agrowon

Pune News : केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी जाहीर केलेले किमान हमीभाव (एमएसपी) तुटपुंजे असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शेतकरी समृद्ध करण्याच्या गमजा मारणाऱ्या भाजपप्रणीत केंद्र सरकारने आमची पुन्हा फसवणूक केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही धडा शिकवू, अशा थेट इशारेवजा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (ता. १९) बैठक झाली. त्यात खरीप हंगाम २०२४-२५ मधील हमीभावांना मान्यता देण्यात आली. ‘शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळण्यासाठी एमएसपीमध्ये आम्ही चांगली वाढ केली आहे,’ असा दावा केंद्राने या बैठकीनंतर केला. परंतु कृषी व्यवस्था अवलंबून असणाऱ्या प्रमुख नगदी पिकांच्या हमीभावात प्रत्यक्षात नगण्य वाढ दिसते आहे.

सोयाबीनच्या भावात प्रतिक्विंटल अवघी २९२ रुपये वाढ जाहीर झाली आहे. तुरीत ५०० रुपये, तर कपाशीच्या दरात अवघी ५०० रुपये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितले, की हमीभाव तुटपुंजे वाढवून शेतकऱ्यांवर अन्याय केला गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या विरोधात आम्ही सत्याग्रह, निदर्शने करणार आहोत. त्यासाठी सोमवार ते शनिवार (ता. २४ ते २९) दरम्यान राज्यभरात शेतकरी संघर्ष सप्ताह पाळला जाईल.

केंद्र शासनाच्या दाव्यानुसार, तेलबिया, कडधान्ये व तृणधान्याचे जाहीर झालेले हमीभाव शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट भाववाढ मिळवून देणारे आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत कारळे प्रतिक्विंटल ९८३ रुपये, तीळ ६३२ रुपये आणि तूर भावात साडेपाचशे रुपये वाढ आहे.

बाजरीचे हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा ७७ टक्के, तूर ५९ टक्के, मका ५४ टक्के आणि उडदामध्ये ५२ टक्के वाढ दिली आहे. उर्वरित पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के अधिक हमीभाव मिळणार आहेत, असाही युक्तिवाद केंद्राने केला आहे. परंतु ही आकडेवारी फसवणूक असल्याचे वाटते आहे.

किसान सभेचे नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले म्हणाले, की केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमांवर पुन्हा मीठ चोळले आहे. निविष्ठा खर्चाचे वाढते दर, दुष्काळ, तोट्यातील शेती यामुळे शेतकरी अडचणीत होता.

मुळात, सोयाबीनला प्रतिक्विंटल ७००० रुपये, तर कपाशीला दहा हजार रुपये भाव हवा होता. हमीभाव जाहीर करताना शेतीमधील प्रत्यक्ष खर्चाचे आकडे केंद्राने कमी गृहीत धरले आहेत. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने सपशेल दुर्लक्ष केले आहे.

महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हमीभावाची नवी रचना स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. ‘‘सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये वाढ हवी होती. ती केवळ २९२ रुपये झाल्याचे मला दुःख आहे. परंतु कापूस, तूर आणि इतर सर्व पिकांच्या हमीभावात केंद्राने चांगली वाढ केली आहे.’’

केंद्र सरकारने सोयाबीन सोडता सर्व पिकांच्या हमीभावांना चांगली वाढ केली आहे. राज्याच्या कृषिमूल्य आयोगाने मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषिमूल्य आयोगासमोर तीन तास शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे भाववाढ झालीच; पण कृषिमूल्य आयोगाच्या अधिकार वाढीचाही प्रस्ताव तयार होतो आहे. यापुढेही अभ्यासूपणे पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.
पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सी२ अधिक ५० टक्के म्हणजेच सर्वंकष उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव केंद्राने दिलेलाच नाही. ही फसवणूक आहे. सर्वंकष उत्पादन खर्च गृहीत न धरता केवळ ए२ अधिक एफएल म्हणजे निविष्ठा व कुटुंबाची मजुरी एवढाच उत्पादन खर्च विचारात घेतला आहे. तोदेखील वास्तव खर्चापेक्षा खूप कमी गृहीत धरल्याने शेतकऱ्यांची थट्टा केली गेली आहे.
डॉ. अजित नवले, किसान सभा
वाढीव हमीभावामुळे दोन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जातील, अशा गमजा सरकारने मारल्या आहेत. मुळात सरकार धान्याची पूर्ण खरेदी करतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कोटीने पैसा जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शेतकरी आजही हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकतो आहे. त्यामुळे आधी करमुक्त आयात थांबवा. वास्तवदर्शी हमीभाव व पूर्ण खरेदीची हमी द्या. तसेच त्यासाठी कायदादेखील करायला हवा.
विजय जावंधिया, शेती प्रश्नाचे अभ्यासक
सोयाबीनमध्ये प्रतिक्विंटल किमान ९०० रुपये वाढ हवी होती. मात्र २९२ रुपयांचा पावाचा तुकडा आमच्यासमोर फेकला गेला आहे. आम्हा शेतकऱ्यांना सरकार भिकारी समजते आहे. शेतकऱ्यांनी लोकसभेला धडा शिकवला आहेच; मात्र अजूनही केंद्राचे डोके ठिकाणावर आल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता येत्या विधानसभा निवडणुकीत या अन्यायकारी सरकारची झांज उतरवल्याशिवाय राहणार नाहीत.
अॅड. अमोल रणदिवे, अध्यक्ष, राज्य बियाणे उत्पादक संघ

खरीप २०२४-२५ करिता हमीभाव (प्रति क्विंटल/रु.)

पीक २०२३-२४ २०२४-२५ वाढ

भात २१८३ २३०० ११७

भात (‘अ’ दर्जा) २२०३ २३२० ११७

ज्वारी (हायब्रीड) ३१८० ३३७१ १९१

ज्वारी (मालदांडी) ३२२५ ३४२१ १९६

बाजरी २५०० २६२५ १२५

नागली ३८४६ ४२९० ४४४

मका २०९० २२२५ १३५

तूर ७००० ७५५० ५५०

मूग ८५५८ ८६८२ १२४

उडीद ६९५० ७४०० ४५०

भुईमूग ६३७७ ६७८३ ४०६

सूर्यफूल ६७६० ७२८० ५२०

सोयाबीन ४६०० ४८९२ २९२

तीळ ८६३५ ९२६७ ६३२

कारळा ७७३४ ८७१७ ९८३

कापूस (मध्यम धागा) ६६२० ७१२१ ५०१

कापूस (लांब धागा) ७०२० ७५२१ ५०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’ची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा

Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

Shetkari Samman Nidhi : नगरला ‘शेतकरी सन्मानच्या' कामावर ‘कृषी’चा बहिष्कार

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT