डॉ. गणेश शेंडगे, डॉ. संतोष शेंडे
Indian Agriculture : सध्याच्या हंगामात हरभरा, गहू पिकांच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. या पिकांना पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. जमिनीच्या खोली नुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये प्रमाणशीर अंतर ठेवावे. एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
अतिशय हलकी-मुरमाड तसेच खूप भारी जमीन हरभरा तसेच गहू पिकास योग्य नसतात. कारण हलक्या जमिनीचा कस चांगला नसल्याने तसेच या जमिनीची जलधारणाशक्ती खूपच कमी असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही.
खूप भारी जमिनीचा कस चांगला असला तरी योग्य प्रमाणात पाणी वापरले नाही तर जमिनीत पाण्याच्या निचऱ्याच्या अभावी पीक चांगल्या प्रकारे वाढू शकत नाही. पर्यायाने अपेक्षित पीक उत्पादन मिळत नाही.
हंगामी पिकास पाणी देताना त्या पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था ही लक्षात घ्याव्या लागतात. पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी दिले नाही किंवा त्या अवस्थेत जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन
गहू पेरणीनंतर साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने ५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. साधारणपणे पेरणीच्या वेळी, मुकुट मुळे फुटणे, कांडी धरणे, फुलोरा व चीक भरणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे.
एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणी नंतर ४० ते ४२ दिवसांनी आणि दोन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ आणि ६० ते ६५ दिवसांनी पाणी द्यावे. तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी गहू पिकास द्यावे.
गव्हास एकच पाणी दिले तर उत्पादनात ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले तर २० टक्के घट येते.
पीक वाढीच्या अवस्था पेरणीनंतरचे दिवस
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८ - २१
कांडी धरण्याची अवस्था ४५ - ५०
फुलोरा येण्याची अवस्था ६० - ६५
दाण्याची दुधाळ अवस्था ८० - ८५
चीक भरण्याची अवस्था ९० - १००
हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन
जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायती शेताची रान बांधणी करताना दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच लांबी सुद्धा उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्याचे सोयीचे होते.
मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. ३० ते ३५ दिवसांनी पहिले आणि ६० ते ६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
या पिकास साधारणपणे २५ सेंमी पाणी लागते. प्रत्येक पाणी प्रमाणशीर देणे गरजेचे आहे. पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे जास्त पाणी झाल्यास पीक उभळते व उत्पादनात मोठी घट होते. त्यासाठी तुषार सिंचन ही अतिशय योग्य पद्धत आहे. या पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे पाणी देता येते. तसेच पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचन पद्धतीमुळे पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
डॉ. गणेश शेंडगे, ९९२१०९००७९
(प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, बारामती, जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.