Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Production : ‘प्रतिकूल परिस्थिती’ चोवीस जिल्ह्यांत जाहीर

Team Agrowon

Pune News : राज्यातील २४ जिल्ह्यांत खरीप पिकांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीकवाढीच्या अवस्थेत मॉन्सून न आल्यामुळे या जिल्ह्यांमधील काही मंडलांमध्ये उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी येणार आहे. त्यामुळे तेथे मध्य हंगामातील प्रतिकुल परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

चालू खरिपात अनेक जिल्ह्यांत पावसातील खंड पडला. त्यामुळे काही मंडलांमध्ये पिकांच्या सरासरी उत्पादकतेत ५० टक्‍क्‍यांहून अधिक घट येण्याची शक्यता आहे. या स्थितीला विमा योजनेच्या कामकाजात ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ (मिडसीझन अॅडर्व्हसीटी) असे म्हटले जाते. अशी स्थिती जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याची तरतुद आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिकूल स्थिती उद्भवल्याची अधिसूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेली आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये सरसकट विमा भरपाई सर्व शेतकऱ्यांना देण्याची तरतुद नाही. अधिसूचना जारी झालेल्या अधिसूचित महसूल मंडलांतील अधिसूचित पीक उत्पादक शेतकऱ्यांनाच भरपाईचा लाभ मिळतो.

या मंडलांमध्ये विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने तत्काळ द्यावी लागते. मात्र, राज्य शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिला असेल तरच ही भरपाई द्यावी, अशी अट आहे. त्यामुळे शासनाने पहिला हप्ता अदा केल्यानंतरच शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल.

राज्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी १४२ लाख हेक्टर आहे. यंदा त्यापैकी १४१.३१ लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. गेल्या हंगामात हाच पेरा १४३.१० लाख हेक्टरवर होता. यंदा पावसाअभावी मूग, उडीद, ज्वारी, बाजारीचे काही क्षेत्र कमी झाले आहे व ते सोयाबीनकडे वर्ग झाले आहे.

सध्या सोयाबीनचे पीक शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. कपाशी पाते, फुले ते बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. तूर शाखीय वाढीच्या स्थितीत तर कणसे भरणे ते दाणे भरण्याच्या स्थितीत मका आहे. भाताच्या लागवडी उशिरापर्यंत चालू होत्या. त्यामुळे भात आता फुटवे फुटणे ते निसवण्याच्या अवस्थेत आहे.

या जिल्ह्यांतील परिस्थिती प्रतिकूल

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही मंडलांमधील खरीप हंगाम प्रतिकुल परिस्थितीत आहे.

पाऊस ९१ टक्के; पण राज्यभर नव्हे!

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, १ जून ते १ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात सरासरी १०११ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा तो ९२६ मिलिमीटर म्हणजेच ९१ टक्क्यांच्या पुढे बरसला. गेल्या हंगामात याच कालावधीत पाऊस ११३ टक्के झाला होता.

गेल्या काही दिवसांतील पावसामुळे टक्केवारी वाढल्याचे दिसत असले तरी राज्यभर चांगला पाऊस झालेला नाही. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती या आठ जिल्ह्यांमधील ८४ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे तेथील काही मंडळांमधील खरीप पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT