Tur, Chana and Urad Agrowon
ॲग्रो विशेष

Tur, Chana Dal Market : तूर, हरभरा, उडदाचे भाव कमी होणार

Market Rate : ‘देशात तूर, उडीद आणि हरभऱ्याची आयात वाढत आहे. तसेच यंदा चांगला मॉन्सून राहणार आहे. त्यामुळे तूर, उडीद आणि हरभऱ्याचे भाव कमी होतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,’’ असा दावा केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी केला.

Team Agrowon

New Delhi News : ‘‘देशात तूर, उडीद आणि हरभऱ्याची आयात वाढत आहे. तसेच यंदा चांगला मॉन्सून राहणार आहे. त्यामुळे तूर, उडीद आणि हरभऱ्याचे भाव कमी होतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,’’ असा दावा केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी केला.

खरे म्हणाल्या,‘‘मागील सहा महिन्यांपासून तूर, हरभरा आणि उडीद डाळीचे भाव वाढलेल्या पातळीवर स्थिर होते. तर मूग आणि मसूर डाळीचे भाव स्थिर होते. पण पुढील महिन्यापासून तूर, हरभरा आणि उडदाची आयात वाढेल. त्यामुळे देशातील उपलब्धता वाढविण्यासाठी मदत होईल. परिणामी, या तीनही कडधान्याचे भाव कमी होतील.’’

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार, देशात सरासरी हरभरा डाळीचे भाव किलोला ८७.७४ रुपये होते. तर तूर डाळ १६० रुपये, उडीद डाळ १२६ रुपये, मूग डाळ ११९ रुपये आणि मसूर डाळ ९४.३४ रुपये प्रतिकिलो होती.

खरे म्हणाल्या, ‘‘यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी यंदा कडधान्याची लागवड वाढविण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने चांगल्या गुणवत्तेच्या बियाण्याचा पुरवठा केला आहे. तसेच डाळींचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार सर्व ते धोरण आखेल.’’ ‘‘सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने भारत ब्रॅन्डच्या नावाखाली हरभरा डाळीची ६० रुपये किलोने विक्री सुरु केली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

आयातीसाठी प्रयत्नशील

‘‘देशात कडधान्याचा पुरवठा वाढविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. भारताने जवळपास ८ लाख टन तूर आयात केली. तर ६ लाख टन उडदाची आयात केली. ग्राहक व्यवहार विभाग सतत जागतिक पातळीवर कडधान्य पुरवठादारांच्या संपर्कात असून जास्तीत जास्त आयातीसाठी प्रयत्न करत आहे. तर देशातील व्यापारी आणि विक्रेत्यांच्या संपर्कात राहून साठेबाजी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे,’’ असे खरे यांनी सांगितले.

मागणी-पुरवठ्यात तफावत

देशातील तुरीचे उत्पादन २०२३-२४ च्या हंगामात ३३ लाख ८५ हजार टन होते. तर देशाला दरवर्षी गरज असते ४५ लाख टनांची. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आयातीतून भरून काढली जाईल, असा दावा सरकार करत आहे.

देशात दरवर्षी ११९ लाख टन हरभऱ्याचा वापर होतो, पण उत्पादन ११६ लाख टनांवरच स्थिरावले.

उडदाचे उत्पादन २३ लाख टन झाले. मात्र देशात वर्षाला ३३ लाख टन उडदाची गरज असते.

तूर, हरभरा आणि उडदाच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी सरकारने आयातीवर जोर दिला आहे.

‘कांद्याची ३५ हजार टन खरेदी’

‘‘पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात वाढ दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बटाट्याची मागणी वाढली. पण या उष्णतेमुळे बटाट्यासह भाजीपाला उत्पादनात घट झाली. कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी सरकारने खरेदीही सुरू केली. आतापर्यंत ३५ हजार टनांची खरेदी झाली,’’ असाही दावा खरे यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT