Nashik News : द्राक्ष हंगामाची सांगता झाल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत खरड छाटण्या पूर्ण झाल्या. पुढे मे महिन्यात अनेक ठिकाणी सलग १७ ते १८ दिवसांच्या २५० ते ४०० मिमी पावसाने अडचणी वाढविल्या आहेत. परिणामी, द्राक्ष बागांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकीकडे हा काळ सूक्ष्म घडनिर्मितीचा असतो, अशातच पावसाने दाणादाण उडाली असून शेतकऱ्यांना रसायने, इंधन व मजुरीसाठी एकरी १५ हजार रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. नाशिक विभागात हा पीक संरक्षण खर्च २०० कोटींच्या आसपास गेल्याची शक्यता आहे.
मे च्या पहिल्या सप्ताहात सुरू झालेल्या पावसामुळे जवळपास महिनाभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळालेला नाही. पावसामुळे रोगास पोषक वातावरण झाल्याने करपा, डाऊनी व भुरी रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सूक्ष्म घडनिर्मिती प्रक्रिया अनेक ठिकाणी अडचणीत सापडली. दीर्घकाळ द्राक्षबागेत पाणी साचून राहिल्याने फवारण्या घेताना अडचणी कायम आहेत. एकीकडे मजूरटंचाई, दुसरीकडे बागेत साचलेले पाणी व वाढत्या पीकसंरक्षण खर्चामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे.
मे मध्ये द्राक्ष बागेसाठी पाण्याचा ताण व उन्हाची गरज असते; मात्र यंदाचा पाऊस व चित्र परस्परविरोधी आहे. त्यामुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. मात्र प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्टोबरपर्यंत गोडी बहर छाटणी होईपर्यंत पाने टिकतील की नाही, याचे शाश्वती नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
...ही आहे परिस्थिती
- करपा, भुरी, डाऊनीचा प्रादुर्भाव वाढल्याने पाने खराब
- थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने अडचणीत वाढ
- पावसामुळे बागेत पाणी साचून राहिल्याने पांढऱ्या मुळ्यांची कार्यक्षमतेवर परिणाम
- कोवळ्या फुटीमध्ये पानाच्या हिरव्या शिरा लाल पडल्या
- अन्नग्रहण होत नसल्याने द्राक्षवेली अशक्त, पानाच्या वाट्या तयार होण्याचे प्रमाण वाढले
- नत्राची पातळी वाढून पोटॅशिअम कमी झाल्याने त्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीवर परिणाम
- संरक्षणात्मक व स्पर्शजन्य फवारण्या वाढल्या
- बागेत पाणी साचल्याने ट्रॅक्टरद्वारे फवारण्या करताना अडचण
पहिल्यांदाच अशी अडचण
६ मे २०२५ पासून पुढील सलग २५ दिवस जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यापूर्वी असा मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नाही. त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये काडी व्यवस्थापन व घड निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने वादळी वारा, मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट बागा अडचणीत आणणारी ठरली आहे. त्यामुळे हंगामी व्यवस्थापन करताना नियोजनपूर्वक पुढे जावे लागणार आहे, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.
करपा मोठ्या प्रमाणावर वाढला असून पावसामुळे पाने फाटली व काड्या मोडल्या. त्यामुळे सूक्ष्म घडनिर्मिती प्रक्रियेत ५० दिवसांच्या दरम्यान बागांवर परिणाम होईल. शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार कॉपरयुक्त बुरशीनाशकांची उपायात्मक फवारण्या, बागेच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापनाची नियोजन करणे योग्य ठरते.डॉ. राकेश सोनवणे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, द्राक्ष व कांदा संशोधन केंद्र (मफुकृवि), पिंपळगाव बसवंत
कोवळी पाने पाऊस व वाऱ्यामुळे जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळे पाने वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सूक्ष्म घडनिर्मिती प्रक्रियेवर मोठा परिणाम होईल असे चित्र आहे. बागा बाळीवर जाण्याची किंवा घड जिरणे, ते लहान निघणे या समस्या येईल. यंदा महागडी रसायने फवरण्याची वेळ आली आहे. त्याचा खर्च वाढता आहे.बापू साळुंखे, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.