Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Department: उत्पादकता वाढीसाठी आराखडे तयार होणार

Government Agriculture Strategy: राज्यातील शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग कृतीशील झाला आहे. खरीप हंगाम २०२५ च्या तयारीसाठी जिल्हानिहाय आराखडे तयार करून तंत्रज्ञान, विदा (डेटा) आणि नवनवीन प्रयोगांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.

मनोज कापडे

Pune News: क्षमता असूनही राज्यातील विविध पिकांची उत्पादकता कमी आहे. त्यामुळे उत्पादकता वाढीसाठी जिल्हानिहाय आराखडे तयार करावेत, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

‘खरीप हंगाम-२०२५’च्या नियोजनासाठी कृषी आयुक्तालयाने आयोजिलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. ७) पुण्याच्या ‘व्हॅम्निकॉम’ येथे झाले. कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामपरिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर यांच्यासह कृषी संचालक डॉ. कैलास मोते (फलोत्पादन), रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण), विनयकुमार आवटे (प्रक्रिया व नियोजन), अशोक किरनळ्ळी (आत्मा) तसेच राज्यातील सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सचिवांनी मागविल्या व्यक्तिगत सूचना

कृषी सचिवांनी या वेळी सादरीकरण करीत भाजीपाला, फळपिके, अन्नधान्याची सध्याची उत्पादकता व त्यातील पिछाडी स्पष्ट केली. सरासरी उत्पादकतेमध्ये पिछाडीवर असलेल्या पिकांचा अभ्यास करावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर आराखडे देताना उत्पादकता वाढीच्या उपाययोजनांचा समावेश करावा. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व त्यातून कृषी विस्ताराच्या योजनांना गती द्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले. विशेष म्हणजे यंदा कृषी सचिवांनी स्वतः क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून विविध सूचना मागवल्या होत्या. या सूचना विचारात घेत सचिवांनी चालू खरिपाच्या नियोजनात नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विदा वापर कळीचा मुद्दा ठरणार

‘पोकरा’चे प्रकल्प संचालक श्री. सिंग यांनी कृषी व संलग्न विभागात विविध माध्यमातून तयार होणारी विदा (डाटा) कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचा वापर भविष्यात कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल, हे स्पष्ट केले. या वेळी त्यांनी कृषी खात्याकडून लवकरच राबविल्या जाणाऱ्या ‘विस्तार’ प्रकल्पाच्या प्रणालीची तांत्रिक माहिती दिली.

शेतकऱ्यांना कार्बन फार्मिंगच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते का, याचीही चर्चा कार्यशाळेत झाली. राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन आणि उपलब्धता वाढीसाठी शाश्वत तंत्रज्ञान कोणते आहे, तसेच नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कमी खर्चात निविष्ठा निर्मितीच्या प्रयोगशाळांची उभारणी कशी करता येईल, या मुद्द्यांवरदेखील या वेळी चर्चा करण्यात आली.

बंद दाराआड खरीप नियोजन कशासाठी?

खरीप नियोजनासाठी कृषी आयुक्तालयाने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेला माध्यमांसाठी प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. ‘‘या कार्यशाळेला ऑनलाइन लिंकद्वारे कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सामील करुन घेणे शक्य होते. खरीप नियोजन किंवा शेतकरी योजनांचा आढावा पारदर्शकपणे घेण्याचा हेतू असल्यास बंद दाराआड बैठका घेणे अर्थहीन आहे,’’ अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Forest Area : राज्याचे वनक्षेत्र आकसत असल्याने चिंतेत भर

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीमधील रस्ते काँक्रीट निविदा घोटाळा

Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र

Sugar Export : साखर निर्यातीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT