Kolvan News: जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात धूळवाफेवर भात पेरणी केली जाते, परंतु यंदा शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे हे शक्य झाले नाही. तसेच भात रोपांसाठी रोपटे तयार करता आले नाही. यामुळे कोळवण परिसरात औताच्या साहाय्याने चिखलात भात पेरणी करण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली.
पावसामुळे रोपट्यांमध्ये भातकूण उगवले (भात कापणी करताना पडलेले भात) यामुळे तण झाले. सध्या सतत पाऊस सुरू असल्यामुळे मशागत करण्यासाठी वाफसा मिळालाच नाही. या सर्वांमुळे भात पेरणी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्याने त्यांना औतानेच मशागत करावी लागली.
काहींनी ट्रॅक्टरच्या साह्याने वाफसा मिळेल तशी मशागत केली व भात पेरणी केली. ज्या जमिनींमधून पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीत काही शेतकऱ्यांनी चिखलात औत धरून जमिनीची मशागत केली. त्यांना नाइलाजाने चिखलातच भात पेरणी करावी लागली.
धूळ वाफेवर पेरणी केल्यानंतर पुन्हा कुळवाची पाळी घालून पेरलेले भात झोपा फिरवून मातीत झाकले जाते. यामुळे संपूर्ण बियाणे उगवते परंतु या वेळी चिखलावर भात पेरणी केल्याने भात बियाणे झोपा फिरवून झाकणे शक्य झाले नाही. उघडे राहिलेले भात बियाणे पाखरे येऊन खाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
पावसामुळे यंदा भात पेरणीस पंधरा दिवस उशीर झाला आहे. नेहमी २५ मेच्या सुमारास भातपेरणी करून त्यास पाणी देतो. आता चिखलात भातपेरणी करावी लागली आहे. या अगोदर असे कधी झाले नाही.अंकुश सोमाजी साठे, शेतकरी, साठेसाई (ता.मुळशी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.