Jalna News : जिल्ह्यात ता.एक सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल दोन लाख ३२ हजार ९७२.३२ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता.पाच) राज्य शासनाकडे सादर केला आहे. शिवाय नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात रविवारी (ता.एक) अतिवृष्टी झाली. शिवाय सात मंडळांत २०० तर १५ मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानाची मागील चार दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक माहिती संकलन करत होते. गुरुवारी (ता.चार) जिल्हा प्रशासनाकडून पीकनुकसानीचा अखेर प्राथमिक अंदाज राज्य शासनाला कळविला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख ५७ हजार ४३५ शेतकऱ्यांच्या दोन लाख ३२ हजार ९७२.३२ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाले आहेत. येत्या ता.१२ सप्टेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कधी मदत देणारा याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अशी आहे नुकसानीची स्थिती
जिल्ह्यात दोन लाख २३ हजार ९७२.३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन लाख आठ हजार ६७०.३२ हेक्टरवरील जिरायत पिकांचे, तीन हजार ८३३ हेक्टरवरील बागायती क्षेत्राचे आणि २० हजार ४६९ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती संकलनाचे काम पूर्ण झाले असून ही माहिती राज्य शासनाला कळवली आहे. तसेच प्रत्यक्ष पंचनामेही सुरू झाले आहेत. येत्या ता.१२ सप्टेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्याचे प्रयत्न आहे.- शशिकांत हदलक, निवासी जिल्हाधिकारी, जालना.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.