Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : दुष्काळी मदत लांबच, पीकविमाही मिळेना

Team Agrowon

Yeola News : कधी नव्हे, इतके प्रचंड नुकसान झाल्याने यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे ठरले. ‘खरिपा’तील पिके हाती न आल्याने शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र, दुष्काळी भागाला मिळणारी कुठलीही मदत अद्याप हातात पडलेली नाही.

हक्काचा पीकविमाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याचा लाभ झाला असून, सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षाच आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता फक्त एक रुपया असल्याने व कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने यंदा विक्रमी संख्येने पीकविमा काढला. पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृण व कडधान्य, तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस, खरीप कांदा ही नगदी पिके नुकसानासाठी पीकविम्यात समावेश आहे.

मका पिकाला हेक्टरी ३५ हजार ५९८, कापसाला ५० हजार, सोयबीनला ५० हजार, बाजरीला २७ हजार ५००, तुरीला ३६,८००, तर मुगाला २२,५०० रुपयेप्रति हेक्टरी विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

तालुक्यातील सर्वच मंडलात २५ दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला. बहुतांशी शेतकऱ्यांना उत्पादनात शंभर टक्के नुकसान झाले असून, सरासरी विचार केला, तरी हंगामातील उत्पादन जवळपास ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.

पीकविम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल, तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार कृषिमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर ही अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही. सुमारे २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तालुक्यात या वर्षी ७८ हजार ९६६ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. यापैकी १३ हजार ६६९ मका उत्पादकांना तीन कोटी २८ लाख ७२ हजार रुपये, १ हजार २९७ बाजरी उत्पादकांना १९ लाख ५५ हजार, तर ११ हजार ३३४ सोयाबीन उत्पादकांना चार कोटी ४० लाख ७० हजार रुपयांची अग्रीम रक्कम अदा केली आहे. आतापर्यंत २६ हजार ३०० शेतकऱ्यांना सुमारे सात कोटी ८८ लाख ९७ हजार रुपये वर्ग झाले आहेत.

ही रक्कम मिळाली असली, तरी तब्बल ५२ हजारांवर शेतकऱ्यांना अजून विम्याची प्रतीक्षाच आहे. हा दुजाभाव कसा केला, असा सवाल व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार पाटोदा, अंदरसूल, राजापूर, अंगणगाव, येवला या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे, तर जळगाव नेऊर, सावरगाव, नगरसूल इतर भागांतील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

‘रब्बी’त फक्त १४ हजार शेतकऱ्यांचा विमा

खरीपपात मोठ्या प्रमाणात विमा उतरवल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.मात्र पाऊसच नसल्याने रब्बीच्या पिकात मोठी घट झाली आहे.परिणामी पीक विमा योजनेत सहभागी होणारी शेतकऱ्यांची संख्या ही घटली आहे.आतापर्यंत केवळ १४ हजार ३८९ शेतकऱ्यांनीच रब्बीच्या पिकाचा विमा उतरवला आहे.

पिकांचे नुकसान झाल्यास विमा कवच उपयोगी पडतो. शेतकरी हिस्साही शासनाने भरल्याने यंदा अवघ्या एक रुपयात प्रमुख पिकांचा विमा काढला. तालुक्यात तब्बल ७९ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. शासन निकषानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम रक्कमही जमा होत असून, आतापर्यंत सुमारे सात कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचा विमा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होईल.
-शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT