Pune News : बिहारमध्ये राजकीय नाट्यानंतर नीतीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपबरोबर जाणे पसंत केले आहे. यावेळी भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचा मुख्यमंत्री म्हणून ९ व्यांदा त्यांनी आज रविवारी (२८ रोजी) सायंकाळी ५ वाजता शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चिराग पासवान हेही राजभवनात उपस्थित आहेत.
मागील काही दिवसांपासून नीतीश कुमार महाविकासआघाडीतील काँग्रेस आणि आरजेडीवर नाराज होते. तर काँग्रेस आणि आरजेडी आपल्याला काम करू देत नाहीत असा आरोप केला होता. या आरोपानंतर आज सकाळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीमाना दिला होता. तसेच पुन्हा सत्तास्थापनेचा दावा केला होता.
निवासस्थान सोडले
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपचा हात धरत एनडीएचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या आई राबडी देवी यांचे निवासस्थान रिकामे केले आहे.
भाजप आणि जेडीयूचं नवं सरकार
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांनी ९ व्यांदा शपथ घेतली. त्यांनी भाजपला सोबत घेत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. त्यांच्या या सत्तेत भाजपतर सोबत आहेच त्याचबरोबर हिंदुस्थान अवाम मोर्चा आणि अपक्ष आमदार आहेत.
आम्ही राष्ट्रहितासाठी एकत्र
दरम्यान हिंदुस्थान अवाम मोर्चाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन मांझी यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 'आम्ही पूर्णपणे एनडीएसोबत आहोत. राष्ट्रहिताचा विचार केला तर सर्वजण एकत्र असतात. सध्या आम्ही राष्ट्रहितासाठी एकत्र आहोत. नितीश कुमार यांना शुभेच्छा.
१२८ आमदारांचे समर्थन
भाजप आणि जेडीयूच्या नव्या सरकारला १२८ आमदारांचे समर्थन असल्याचे बोलले जात आहे. तसे पत्र राज्यपाल यांच्याकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे.
नीतीश यांच्यासह शपथ घेणारे इतर कोण?
नीतीश कुमार यांचा आज सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी नीतीश यांच्यासह एकूण ८ मंत्र्यांनी शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री
1. सम्राट चौधरी (भाजप), 2. विजय सिन्हा (भाजप)मंत्री, 3. डॉ. प्रेम कुमार (भाजप), 4, विजेंद्र प्रसाद (जेडीयू), 5. श्रवण कुमार (JDU), 6. विजय कुमार चौधरी (JDU), 7. संतोष कुमार सुमन (आम्ही), 8. सुमित सिंग (अपक्ष)
मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया
दरम्यान नीतीश कुमार यांच्या एनडीएमध्ये जाण्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्यांना जायचे आहे, त्यांना आम्ही रोखू शकत नाही. धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती अशा प्रकारे आघाडी सोडली नसती. कालपर्यंत त्यांनी (नितीश कुमार) मला सांगितले होते की आपण एकत्र काम करू. त्यांनी हे पाऊल उचलले हे दुर्दैवी आहे,